सहजच मनात आले काय असेल ही गर्दी. मग सुरू झाली विचारांची गर्दी शब्दांना मांडत… गर्दी मनातल्या शब्दांची. गर्दी अस्वस्थ जाणिवांची. गर्दी जमावातील एकटेपणाचीही. गर्दी मनस्वी द्वद्वांची तर कधी गर्दी अंतरातील अपूर्णतेची. गर्दी फक्त सामाजिक संदर्भातील नसते तर ती आपल्याच आपल्यातील अव्यक्त विचारांचीही! मनातील अनाहूत इच्छांची, बालपणात पाहिलेल्या व तरुणपणीही अपूर्ण राहिलेल्या संध्याकाळच्या टप्प्यावर अजूनही तशाच साठलेल्या वाढत गेलेल्या स्वप्नांची गर्दी…
असंख्य नात्यांच्या गदारोळाची गर्दी असूनही स्वतःच स्वतः ला शोधणे इष्ट हे सांगणारी गर्दी… गर्दी नेहमीच वाटते सहजतेने चालत असते, परंतु याचा अर्थ असा नाही की गर्दी नेहमीच योग्य मार्गावर चालते. आपला स्वत:चा मार्ग निवडणे योग्य कारण आपल्यापेक्षा कोणालाही आपले चांगले माहिती नाही. मदतीसाठी आलेल्या हातांनाही स्वार्थाचा गंध देणारी तात्पुरती भरगच्च वाटते खरी पण आयुष्याच्या संध्याकाळी मनातील हूरहूर गर्दी करू लागते साठवलेल्या आठवणींची… येथे कुणीच ओळखीचे न राहिले होतात भास.
गर्दीत राहण्यामागे मानसिकताही असतेच. मानवी स्वभावाला स्वतःला मिळणारे कौतुक, प्रशंसा, मान या सगळ्या गोष्टींची गरज मग यातून ही मानसिकता अवतीभवती गर्दी असणं याची साक्ष… तर एखाद्याला आपले असणंही कळू नये असे वाटणेही गर्दीचाच एक भाग.
एखाद्या विशिष्ट कारणासाठी किंवा कारणाविना, माणसांच्या अनियंत्रित शिस्तीच्या अभावाने एकत्र येणं म्हणजे गर्दी! हे सामाजिक स्तरांवर तर एखाद्या कौटुंबिक कौतुक समारंभ कार्यक्रमानिमित्ताने जमलेला आप्तस्वकीयांचा गोतावळा यालाही गर्दी म्हणता येईल, जर साधारण क्षमतेपेक्षा जास्त लोक जमले तर अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्न. मग इथे व्यवस्थापन हाही एक मुद्दा लक्षात घ्यावा लागेलच.
कारण गर्दीची आकलनशक्ती ही वैयक्तिक आकलनशक्तीपेक्षा कमी असते. गर्दीचा नैसर्गिक कल परिस्थिती बिघडविण्यास कारणीभूत ठरू शकतो. जशी अनावश्यक शब्दांची गर्दी मूळ विषयाला भरकटू शकते. पण मनातील शब्द कागदावर उतरवताना एखाद्या शब्दावर अन्याय होऊ नये तर विषय पोहचावा असा मानसिक विचार. थोडक्यात, त्याचे संतुलन नाहिसे होऊ शकते. शब्दांच्या अतिगर्दीमुळे पण या अपूर्णतेतच मजा आहे. एखादी छोटीशी घटना अथवा अफवा गर्दी निर्माण करू शकते. एखाद्या गोष्टीची क्रेझ म्हणजे ही गर्दीच असते. गर्दीकडे सारासार विवेकबुद्धी नसते.
गर्दीतील व्यक्ती ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतात. गर्दी ही कधीही स्फोट होऊ शकणारी एक आपत्तीही असते. ती अनियंत्रित झाल्यास, सामाजिक बंधनावर मर्यादा येते. गर्दी अनियंत्रित झाली तर, माणसांच्या मनात मी व माझे, आपले, माझ्या आप्तांचे अस्तित्व, इतकाच विचार मनात येतो. म्हणजे बघा स्वतःलाच स्वतःचे चांगले ओळखता येते मग कुणाचे ऐकून गर्दी कशाला? तोटा आपलाच, वेळेचा अपव्यय जर कारण विधायक नसेल तर. गर्दी मानसशास्त्र, तिचे व्यवस्थापन हे सामाजिक पैलू त्यात नको पाडूयात. गर्दी, बघा केवढे पैलू मिळाले. सहजच सुचले ते मांडले तुमच्या माझ्या मनातलेच. तुम्हीही लागलात ना विचार करायला, या शब्दांची, विचारांची गर्दीच ती…
मधुरा धायगुडे