मुंबई : कुणाची माय व्याली तरी नाणार आणू देणार नाही. आम्ही एकदा प्रकल्प घालवला की घालवलाच. नाणार प्रकल्प आम्ही घालवला आहे. नको त्या मुद्द्यात तोंड खुपसू नका, असा सल्ला शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिला आहे. यामुळे नाणार प्रकल्पावरून शिवसेना आणि भाजपातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भाजपवर टीका केली.नाणारला एकदा घालवल्यानंतर परत प्रकल्प आणण्यासाठी शिवसेना कबुली देणार नाही. आम्ही एकदा प्रकल्प घालवला म्हणजे घालवला.असे ते म्हणाले.
सर्वच पक्षांच्या नेतृत्वाच्या सहमतीने नाणार प्रकल्प आम्ही आणू, अशी माहिती भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. विधानसभा निवडणुकीनंतर नाणारच्याबाबतीत लोकांच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे समजून घेतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या पार्श्वभुमीवर देसाई यांनी हे वक्तव्य केले आहे.
राजपत्राला काही किंमत आहे की नाही ? असा प्रश्न विचारत हे जे लोक बोलतायत ते तोंडाची वाफ घालवतायत असा टोलाही त्यांनी लगावला. नको त्या मुद्यात तोंड खुपसू नये. नाणार गेलेला आहे, प्रदुषण न करणारे उद्योग कोकणात आणणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीत भाजप – शिवसेना युती झाल्यानंतर कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील जिल्ह्यातील मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला गेले आहेत. रत्नागिरीत एकही मतदारसंघ न मिळाल्याने भाजपकडून बंडखोरी झाली होती. मात्र, भाजपच्या बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. तर सिंधुदुर्गात युती तुटल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केली. भाजपकडून नितेश राणे यांना एबी अर्ज दिल्यानंतर शिवसेनेतून बंडखोरी झाली. शिवसेनेनेही बंडखोर उमेदवाराला एबी अर्ज दिला. त्यामुळे नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेचा उमेदवार आहे. त्यामुळे भाजपही आक्रमक भूमिका घेत आहे.