मुंबई – नानाभाऊ, थोडं आत्मचिंतन तुम्ही करा, थोडं आम्ही करतो. कसब्याबाबत आम्ही आत्मचिंतन करतो, चिंचवडबद्दल तुम्ही आत्मचिंतन करा. पण तीन राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस कुठेच दिसत नाही. त्यामुळे तुमच्यावर अशी वेळ आली आहे की एखादा जरी विजय मिळाला तरी सभागृहात उभं राहून सांगावं लागतंय अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत काँग्रेसला टोला लगावला आहे.
दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच एक नाव चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलं होत. ते नाव होत रवींद्र धंगेकर यांचं. धंगेकर यांना काँग्रेसने कसब्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं तेव्हाच ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचं स्पष्ट झालं होत. नगरसेवक म्हणून धंगेकर यांनी केलेल्या कामाची पोचपावती या निवडणुकीच्या निकालातून कसब्याच्या जनतेने रवींद्र धंगेकर यांना दिली. समोर धंगेकर यांचा आव्हान असल्याने ही निवडणूक जड जाणार असल्याचा अंदाज भाजपला आला होता. यामुळेच भाजपने येथे आपली सर्व ताकद पणाला लावली होती. मात्र भाजपची प्रचार यंत्रणा, त्याला एकनाथ शिंदे यांचं बळ असतानाही महाविकास आघाडीचे धंगेकर वरचढ ठरले.