पुणे – पुण्यात झालेल्या एका मुलाखतीदरम्यान राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवारांनी ‘मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला 100 टक्के आवडेल’, असे विधान केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. अजित पवारांच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय भूकंपाच्या चर्चा खऱ्या ठरतील का? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. यावर अनेक राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहे. यातच आता कॉँग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर प्रतिक्रिया दिली आहे.
“अजित पवारांकडे 145 आमदार असतील तर त्यांनी मुख्यमंत्री व्हावं. मी मुख्यमंत्री बनतो, असं सारखं म्हणायची काही गरज नाही. खरं तर आज राज्यात अनेक प्रश्न आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत, खारघरमध्ये श्रीसेवकांचा मृत्यू झाला, महागाईमुळे जनता त्रासली आहे, बेरोजगारी वाढत आहे, त्यामुळे अशा राजकीय विषयांकडे लक्ष देण्यापेक्षा या मुद्द्यांकडे लक्ष देण्याची जास्त गरज आहे”, असं नाना पटोले म्हणाले.
अजित पवारांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत नाईलाजाने काम केल्याचे विधान केले होते. यावर नाना पटोलेंनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, “अजित पवारांनी त्यावेळी शपथच घ्यायला नको होती. उपमुख्यमंत्री पदावर बसून खदखद निर्माण करण्यापेक्षा बाहेर राहून खदखद व्यक्त करायला हवी होती. मुळात असं वक्तव्य करणं चुकीच आहे. काही गोष्टी आवडल्या नाहीत तर त्याचवेळी त्यांनी बोलायला हवं होतं”, असंही पटोले यावेळी म्हणाले.
काय म्हणाले होते अजित पवार ?
“मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला 100 टक्के आवडेल. मी 2024 ची वाट कशाला बघू आता देखील राज्याचा मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारायला तयार आहे. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे या दोन्हीसोबत मी काम केले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आनंदाने तर पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत वरिष्ठांनी सांगितले म्हणून काम केले. राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदाचं अजिबात आकर्षण नाही. पण प्रत्येकवेळी एकतर आमच्या जागा कमी आल्या किंवा मुख्यमंत्रिपदाची संधी असताना वरिष्ठ पातळीवर काही वेगळा निर्णय झाला आणि ती संधी गमावली,” असे अजित पवारांनी सांगितले
“पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे दोघांनाही आमदारकीचा अनुभव नव्हता. त्यांच्या काळात मी उपमुख्यमंत्री पदावर काम केलं. 2019ला महाविकास आघाडी झाली. ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात आम्ही एकत्रिपणे चांगलं काम केलं. तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात कधी समाधानाने तर कधी नाईलाजाने काम करावं लागलं”, असेही अजित पवार म्हणाले.