मुंबई – कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर टीका केली आहे. पटोले यांनी आघाडी सरकारकडून आपल्यावर पाळत ठेवण्यात असल्याचे आरोप केले आहेत. सरकारकडून नजर ठेवली जात असल्याचा त्यांनी दुसऱ्यांना आरोप केला आहे. त्यावरून शिवसेनेने पटोले यांना चांगलेच सुनावले आहे.
पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा संताप व्यक्त केला आहे. शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी सुद्धा पटोले यांना सुनावले आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
अरविंद सावंत म्हणाले की, “नाना पटोले हे एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते विधानसभा अध्यक्ष राहिले आहेत त्यामुळे आपण काय बोलतोय याचं भान ठेवलं पाहिजे. नाना पटोले यांना जे काही बोलायचं आहे ते त्यांनी खाजगीत बोलावं चव्हाट्यावर बोलू नये” असे खडे बोल सुनावत सावंत यांनी पटोले यांना सुनावले आहे.
पुढे बोलताना दे असेही म्हणाले की, ”तुम्हाला काही अडचण आहे, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना किंवा बाळासाहेब थोरात यांना सांगा; पण असं वक्तव्य करणं योग्य नाही. अशा लोकांमुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा खराब होणार नाही, याचा विचार केला पाहिजे. त्यांना कसं थांबवायचं हे आता त्याचा पक्ष आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील.”
काय म्हणाले होते नाना पटोले?
‘महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे हे त्यांना माहीत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. मी कुठे काय करतो ते सगळे त्यांना माहीत आहे. त्यांच्याकडे मुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपदाचा कार्यभार आहे. त्यामुळे यंत्रणांना सर्व रिपोर्ट त्यांना द्यावे लागतात. राज्यात कुठे काय चालू आहे, आंदोलनं कुठे होत आहे. याबद्दलची प्रत्येक अपडेट त्यांना द्यावी लागत असतात. मी कुठे काय करतो, हे सुद्धा त्यांना माहीत असते’, असे आरोप नाना पटोले यांनी महाविकास आघाडी सरकारवरमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर केला होता.