गोंदिया : राज्यातील विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले होते. त्यानंतर राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे पटोले यांनी सांगितले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र कॉंग्रेसकडून निवडणुकांबाबत ही भूमिका घेण्यात आली आहे. नाना पटोले गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
नाना पटोले म्हणाले की, राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल. त्या दृष्टीने पक्षाने तयारी केली आहे. निवडणुका स्वबळावरच, असा पक्षातील नेते व कार्यकर्त्यांचादेखील सूर आहे.
केंद्रातील भाजप सरकारमुळे देशाचे वाटोळे झाले आहे. मागील सात वर्षांपासून देशाच्या विकासाला उतरती कळा लागली आहे. भाजप सरकारने देशाला चीनचे वाढते वर्चस्व, कोरोनामुळे वाढलेले मृत्यूचे प्रमाण आणि त्यामुळे जळणाऱ्या चिता आणि यातूृन आलेल्या संकटामुळे देशवासीयांची वाढविली चिंता असे तीन ‘चि’ देशाला दिल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे.
भाजप सरकार राज्यातील महाविकास आघाडी सरकारलादेखील काम करू देत नसून त्यात वारंवार अडथळे आणण्याचा प्रयत्न करीत आहे. मराठा समाजाचे आरक्षण रद्द होण्यास केंद्र सरकारचेच धोरण जबाबदार असल्याचा आरोप करीत या सरकारचा खरा चेहरा जनतेपुढे आणण्यासाठी व तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्यव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मी महाराष्ट्राचा दौरा करीत आहे. असे नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या स्वबळावर निवडणुक लढण्याच्या निर्णयाला शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत.