माळिये जेउते नेले । तेउते निवांतचि गेले । तया पाणिया ऐसे केले । होआवे गा ।।120:12।। एऱ्हवी तरी सुभटा । उजू कां अव्हांटा । रथु काई खटपटा। करितु असे? ।।121:12।।
श्री ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायातील या दोन ओव्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की, जर अभ्यास करायला तुला कठीण वाटत असेल तर दुसरा मार्ग सांगतो.
जे काही व्यवहार तू करशील, ते सर्व मी केले आहेत असे न म्हणता परमेश्वरानेच माझ्याकडून करवून घेतले आहेत, असे समज. हा मार्गसुद्धा तुला माझ्याकडेच आणेल. ते म्हणतात, ज्याप्रमाणे माळी नेईल तिथे पाणी शांतपणे जाते,
त्यासारखेच पुढे येईल ते कर्म तू कर. रथ कधीतरी चालकाला सांगतो का की, मला फक्त चांगल्या रस्त्यावरच ने? त्याचप्रमाणे तूसुद्धा देवाजवळ चांगलेच कर्म करण्याची मागणी करू नकोस.