नागपूर – पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत बदल करीत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण ही योजना म्हणजे लबाडाचे जेवण आहे. जेवल्याशिवाय काही खरे नाही अशी टीका, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.
विधानसभेत घोषणा करूनही गेल्या सहा महिन्यात अवकाळी पावसामुळे झालेली नुकसानभरपाई दिलेली नाही. आवळा देऊन कोहळा काढण्याचे प्रकार सरकारने बंद करावे, असे पटोले यांनी सरकारला सुनावले.
शेतकऱ्यांना मदत करायची असल्यास बियाणे खते, अवजारे याचे दर कमी करावे, जीएसटी कमी केला पाहिजे. सरकारने व्यापारीवृत्ती थांबवली पाहिजे. सहकारी संस्थाचे कामकाज परिणामकारक होण्यासाठी यापुढे अक्रियाशील सभासदांना संस्थेत मतदान तसेच निवडणूक लढवण्यास मज्जाव करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, शिंदे-फडणवीस सरकाराने कुठलाही अध्यादेश काढला तर त्याचा परिणाम होणार नाही. भाजप हा शेतकऱ्यांमधून संपलेला पक्ष झाला आहे. त्यामुळे सहकाराच्या निर्णयाचा त्यांना जिंकण्यासाठी फायदा होणार नाही, असेही पटोले म्हणाले.
फडणवीस-राज भेटीला महत्त्व नाही
मुंबई कॉंग्रेस बैठकीत लोकसभा आणि विधानसभानिहाय आढावा घेणार आहोत. भाजपला केंद्र व राज्याच्या सत्तेतून बाहेर काढण्याच्या प्लॅनिंगचा आढावा घेणार आहोत. मग आम्ही मित्र पक्षाशी बोलणार आहोत, असे पटोले यांनी सांगितले. फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्याला फारसे महत्त्व देण्याची गरज नाही. भाजप मतविभाजनाचे राजकारण अनेक वर्षांपासून करीत आहे. पुण्यात पोटनिवडणूक लागू तर द्या. आमचा प्लॅन तयार आहे. नंतर सगळे बसून निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.