एबी फॉर्म हातात मिळेपर्यंत इच्छुकांचा जीव टांगणीला
शिरूर – शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघात लगीनघाई आजपासून सुरू झाली; परंतु इच्छुक उमेदवारांची मात्र धाकधूक वाढली आहे. जोपर्यंत पक्षाकडून उमेदवारी जाहीर होत नाही व जोपर्यंत हातामध्ये एबी फॉर्म पक्षाचा मिळत नाही तोपर्यंत सर्व उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.
शिरूर विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत आज 27 सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून आज पहिल्या दिवशी पाच जणांनी सहा उमेदवारी अर्ज घेतले आहेत. त्यात मुख्यत्वे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या नावाने त्यांच्या समर्थक सुभाष कोळपे यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर 3 ऑक्टोबर गुरुवार हा दिवस उमेदवारी देण्यासाठी चांगला दिवस असल्याचे बोलले जात असल्याने या दिवशी मोठ्या संख्येने उमेदवार आपली उमेदवारी दाखल करतील.
आज निवडणूक कार्यालयाबाहेर अनेक इच्छुक उमेदवारांच्या समर्थकांनी उमेदवारी अर्ज घेणे व त्याबाबत माहिती घेण्यासाठी त्यांची लगबग सुरू असल्याचे दिसून आले. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याअगोदर लागणाऱ्या परवानग्या, कागदपत्रांची जुळवाजुळव, शासकीय देणे याबाबत उमेदवारांच्या समर्थकांची घाईगडबड दिसून येत होती. आजपासून उमेदवारी अर्ज भरणे सुरुवात झाली असली तरी आज पासूनच विक्रीही होत आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज पहिल्या टप्प्यामध्ये इच्छुक उमेदवार घेऊन जातील.
पितृपक्ष संपल्यानंतर चांगल्या दिवसाचा मुहूर्त आपापल्या महाराजांकडून घेऊन मगच अनेक उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यात अद्यापही कुठल्याही पक्षाचे उमेदवार जाहीर झाले नाहीत. हे उमेदवार पितृपक्ष संपल्यानंतर लगेच जाहीर होतील अशी सर्वांना आशा आहे. अनेक उमेदवार मुंबई, पुणे, दिल्ली यांच्या संपर्कात असल्याचे समजते. अनेकांनी आपली स्वतःची उमेदवारी पक्की ठरवली असली तरी जोपर्यंत नाव जाहीर होत नाही तोपर्यंत सर्व इच्छुक उमेदवारांना धाकधुक आहे.
शिरूर -हवेलीत तिरंगी लढत?
शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघामध्ये सध्या भाजपच्या वतीने आमदार बाबुराव पाचर्णे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने माजी आमदार अशोक पवार व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद हे मुख्य इच्छुक असून जर युती नाही झाली तर शिवसेनेच्या वतीने ज्ञानेश्वर माऊली कटके हेही इच्छुक असल्याचे समजते. मनसेच्या वतीने अद्याप इच्छुक उमेदवार व खंदा कार्यकर्ता अजून समोर आलेला नाही. हे सर्व असले तरी शिरूर तालुक्यात तिरंगी लढत होईल अशी सर्व राजकीय जाणकारांची माहिती आहे.