गावात सर्वपक्षीय साखळी उपोषण सुरू; राजकीय नेत्यांना गावबंदी
टाकळीभान – श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून त्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा, या मागणीसह संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठींबा देण्यासाठी सकल मराठा समाज व ग्रामस्थांतर्फे येथील तलाठी कार्यालयासमोर रविवार साखळी उपोषणास सुरूवात करण्यात आली.
मराठी समाजास आरक्षण मिळण्यासाठी साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून आरक्षण मिळण्यासाठी येथील ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच कान्हा खंडागळे, अशोक कचे, सदस्या दिपाली खंडागळे, कविता रणनवरे, लता पटारे या पाच सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा आरक्षण समितीकडे दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी सरकार विरुद्ध एल्गार पुकारला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले असून अंतरवाली सराटी या ठिकाणी ते आमरण उपोषणास बसले आहे. सध्या त्यांची प्रकृती खालावली आहे. अशा परिस्थितीतही शासनाला जाग येत नसल्याने रविवारपासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जरांगे पाटील यांना पाठींबा देण्यासाठी साखळी उपोषणे सुरू झाली आहे. तसेच ठिकठिकाणी नेत्यांना गावबंदी केली जात आहे. टाकळीभान येथेही नेत्यांना गावबंदी करण्यात आली असून सकल मराठा समाज व समस्त ग्रामस्थांनी साखळी उपोषणास सुरूवात केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करून साखळी उपोषणास सुरूवात करण्यात आली. यावेळी स्थानिक पातळीवरील सर्वपक्षीय पुढाऱ्यांनीही या उपोषणास पाठींबा दर्शविला असून मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी शासनाकडे केली आहे. यावेळी जय भवानी जय शिवाजी, भारत माता की जय, एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता.