जामखेड – जामखेड-सौताडा महामार्गाचे काम सुरू असून, या महामार्गावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहे. याबाबत अतिक्रमण काढण्यासंदर्भात जामखेड नगरपरिषदेकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. मात्र, अतिक्रमण काढताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता शासकीय नियमाप्रमाणेच अतिक्रमण काढण्याची मागणी युवा नेते अड. मयूर डोके पाटील यांनी केली.
खासदार डॉ. सुजय विखे यांनी या महामार्गासंदर्भात जामखेड येथे बैठक घेऊन महामार्गाचे काम दर्जेदार करून रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून अतिक्रमणाबाबत नगरपरिषदेला तातडीने नोटिसा काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
जामखेड नगरपरिषद व राष्ट्रीय महामार्गाकडून आतापर्यंत अनेक वेळा नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र पुढे काहीच कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्याच्या कामाला वेळ लागत आहे. याधीही शहरातील टपरीधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली होती, मात्र अनेकांचे अतिक्रमणे जैसे थे च होते.
त्यामुळे नगरपरिषदेने अतिक्रमण काढताना गरीब – श्रीमंत असा फरक न करता शासकीय नियमाप्रमाणेच नगररोड, जयहिंद चौक, बीड रोडवरील अतिक्रमण काढण्यात यावे व रस्त्याचे काम दर्जेदार करण्याची मागणी डोके यांनी केली आहे. जामखेड ते सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक महिन्यांपासून संथगतीने सुरू आहे. कामाची गती व दर्जाबाबत संबंधित ठेकेदार कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.