पिंपरी – एकीकडे इंद्रायणीच्या प्रदूषणाचा मुद्दा थेट विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गाजत आहे. अशातच केंद्र सरकारच्या अमृत-2 अभियानामध्ये इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत एकूण 526 कोटी रुपयांची निधी उपलब्ध होणार आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील चर्होलीमध्ये इंद्रायणीनदीच्या पात्रालगत मोठाया प्रमाणावर राडारोडा टाकून इंद्रायणीनदीचा गळा घोटण्याचे काम चर्होलीत होत आहे. मोठ्या प्रमाणावर भराव टाकून नदीपात्र अरूंद करण्याचे काम दिवसाढवळ्या केले जात आहे. महापालिका प्रशासन मात्र हे सर्व निमूटपणे पाहत असल्याचे चित्र आहे.
कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर 11 नोव्हेंबरला फेासाळलेल्या इंद्रायणीचे रुप पाहून, आळंदीकरांसह भाविक चांगलेच संतापले होते. प्रासारमाध्यमांनी हा मुद्दा लावून धरल्याने, लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न थेट राज्याच्या विधीमंडळात उपस्थित केला. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पिंपरी-चिंचवडची जीवनवाहिनी पवना आणि इंद्रायणी नदी प्रदूषण त्यावर अपेक्षीत उपाययोजना आणि राज्य व केंद्र सरकारची अपेक्षीत कार्यवाही याबाबत आमदार लांडगे यांनी राज्य सरकार आणि संबंधित मंत्रीमहोदय यांचे लक्ष वेधले.
यावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबत सकारात्मक उत्तर दिले. महापालिका, पीएमआरडीए आणि एमआयडीसी अशा तिनही अस्थापनांना एकत्रितपणे नदी सुधार प्रकल्पावर कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, इंद्रायणी नदी प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असून, केंद्र सरकारच्या अमृत-2 अभियानामध्ये इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत एकूण 526 कोटी रुपयांची निधी उपलब्ध होणार असून, राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या शिफारसीनुसार कार्यवाही करावी, अशा सूचना राज्याच्या नगरविकास विभागाने दिल्या आहेत.
हा प्रस्ताव केंद्र शासनाच्या शिखर समितीकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. तसेच, या प्रकल्पासाठी महराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून तांत्रिक मान्यता घेवून आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करुन शासनास सादर करावे, असे आदेश नगर विकास मंत्रालयाने महापालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे निविदा पूर्व प्रक्रियेला गती मिळाली आहे.
प्रभावी प्रयत्नांची गरज
सध्या इंद्रायणीनदीच्या प्रदूषणाचा विषय गांभिर्याने घेतला जात असतानाच नदीपात्रालगत भूमाफियांचा फास आणखी घट्ट होत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील चर्होली बुद्रुकमधील नदी पात्रालगत दिवसाढवळ्या राडारोडा टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे केवळ चर्चेच्या फैरी झाडत बसण्यापेक्षा इंद्रायणीचा गुदमरणारा श्वास वाचविण्यासाठी प्रभावी प्रयत्नांची गरज आहे.