शनिशिंगणापूर झाले प्रदूषणमुक्त; देवस्थानला वर्षाकाठी मिळते कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न
सोनई/शनिशिंगणापूर – मुलूखावेगळे गाव म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेले शनिशिंगणापूर येथील शनिमहाराजांना अर्पण करण्यात येणाऱ्या तेलापासून साबण, ग्रीससह केमिकल तयार केले जात असल्यामुळे हा परिसर प्रदूषणमुक्त झाला आहे. शिवाय या उत्पादनांमुळे देवस्थानला वर्षाकाठी कोट्यवधींचे उत्पन्न मिळत आहे.
भाविकांकडून शनिमहाराजांना अर्पण करण्यात येणाऱ्या तेलामुळे प्रदूषण होत असल्याची ओरड रहिवाशांकडून होत होती. त्यावर देवस्थानने ज्याप्रमाणे तिरुपती बालाजी येथे अर्पण केलेले केस विकून देवस्थान कोट्यवधी रुपये कमावते, तसेच महाराष्ट्रातील अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी निर्माल्य म्हणून टाकून दिलेल्या फुलापासून अत्तर, अगरबत्ती, खत आदी वस्तू तयार करून अनेक देवस्थाने व सामाजिक संस्थांनी प्रदूषण कमी करण्यासोबतच त्या त्या देवस्थानला आर्थिक लाभ मिळून दिला.
तशाच पद्धतीने शनिशिंगणापूर येथे वर्षाला शनिदेवाला अर्पण केलेल्या हजारो लिटर तेलापासून साबण, ग्रीससह केमिकल तयार करण्यात येत आहे. याचा परिणाम शनिशिंगणापूर प्रदूषणमुक्त होण्यात झाला आहे. याशिवाय देवस्थानला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
शनिमहाराजांना वाहण्यात आलेले तेल सन 2000पर्यंत येथे असलेल्या पानस नाल्यात वाहून जात होते. या तेलामुळे मंदिर परिसर अस्वच्छतेच्या विळख्यात सापडला होता. मात्र, परिसरातील उच्चशिक्षित युवक सीताराम तुवर याने या वाहून जात असलेल्या तेलाचा पुनर्वापर करण्यासाठी संशोधन केले. ते संशोधन यशस्वी झाले. पाणी आणि तेल एकाच वेळी वेगळे करण्यात येऊन या तेलाचा पुनर्वापर खाण्याव्यतिरिक्त वापर होऊ लागला. त्यामुळे देवस्थानला या तेलापासून वर्षाला अडीच कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते.
देवस्थानतर्फे निर्माल्य तेलाचे पूर्वी 11 महिन्यांसाठी खुले टेंडर काढण्यात येत होते. साधारण दीड कोटीपर्यंत लिलाव होत होते. मात्र, देवस्थानने स्वतःहून भाव निश्चित करून 70 रुपये किलोप्रमाणे टेंडर घेत असल्याने वर्षाला जवळपास 17 टॅंकर म्हणजे 340 टन तेल जमा होत असून, यातून अडीच कोटीचे उत्पन्न देवस्थानला मिळत आहे. शनी मूर्तीवर टाकलेले तेल पाइपद्वारे साठवण टॅंकमध्ये सोडले जाते. तेथे पाणी आणि तेल वेगळे करून टॅंकर भरले जातात. येथील निर्माल्य, तेलाला गुजरात राज्यात मागणी आहे. या तेलापासून साबण, ग्रीस, व केमिकल कंपन्यांसाठी या तेलाचा वापर केला जातो.
शनि महाराजाला तेल प्रिय आहे. प्रभू रामचंद्र ध्यानधारणेला बसले असताना हनुमान तेथे होते. शनिमहाराजांनी प्रभू रामचंद्रांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, हनुमानाने परवानगी नाकारली तेव्हा शनिमहाराजांनी व्यत्यय आणला. त्यामुळे हनुमानाने शेपटीने धरून शनिमहाराजांना परफटल्याने त्यांच्या अंगावर ओरखडे उमटले. मग शनि महाराजांनी हनुमानाचे पाय धरून क्षमा मागितली. त्यानंतर हनुमानाने तीळ तेल लावल्यानंतर हे ओरखडे नाहीसे झाले. तेव्हापासून शनिमहाराजांना तीळ तेल व आंघोळ करण्याची परंपरा आहे.
अशोक देवा कुलकर्णी, पुरोहित शनिशिंगणापूर