नेवासा, (प्रतिनिधी)- गोरगरीब रेशनकार्ड धारकांना दोन वेळेचे दोन घास सुखासमाधाने खाता यावे म्हणून स्वस्त धान्य दुकानात मोफत धान्य गोरगरिबांना देण्याचे काम केंद्र व राज्य सरकारकडून होत आहे.
आता सरकारकडून आनंदाचा शिधा आणि आणि महिलांना मोफत साड्याही देण्याचा स्तृत्य उपक्रम या योजनेतून सुरू झालेला असतानाच पुरवठा विभागाच्या “जाऊ तेथे खाऊ” या उक्तीप्रमाणे रेशनकार्डावरील मयत व्यक्तीच्या नावे आलेला शिधा थेट तस्करांच्या घशात घालून काळाबाजार सुरूअसल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे.
मेलेल्यांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा अजब कारभार पुरवठा विभागाकडून केला जात असताना याला जबाबदार कोण? दरमहा लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या उधळणीला सरकारी अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप होत असताना सरकारी यंत्रणा मूग गिळून आहे.
किती वर्षांपासून मेलेल्या व्यक्तींच्या नावावरचा शिधा धान्य तस्करांच्या घशात घातला याची रितसर चौकशी करू सरकारी यंत्रणेतील गफलाच उघड करण्याची मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे.
सुमारे १५ वर्षांपासून मयत झालेल्या व्यक्तींची नावे रेशनकार्डातून कमी झालेले नसून मयत व्यक्तीचे नावे ऑनलाईनला जशीच्या तशीच असल्यामुळे मयताच्या नावावर येत असलेला शिधा रेशनकार्डावर मयत कुटुंबीयांना दिला जात नाही.
मात्र, त्यांच्या नावावर आलेला शिधा थेट धान्य तस्करांच्या घशात घालण्याचा प्रकार सुरू आहे. दरमहा होणाऱ्या लाखो रुपयांच्या अन्नधान्य घोटाळ्यास जबाबदार कोण? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
पुरवठा विभागाच्या अर्थपूर्ण संबंधातून कुंपणच शेत खाण्याचा प्रकार उजेडात येत असताना सरकारी अधिकारी या भ्रष्टाचारावर पांघरून घालण्याचा प्रकार करत आहे. जनतेतून पुरवठा विभागाच्या कारभाराबाबत आश्चर्याबरोबरच चीडही व्यक्त केली जात आहे. सरकारी अधिकारी भ्रष्टाचार रोखण्यासाठी असताना त्यांच्या कृपार्शिवादामुळे मेलेल्या मढ्यावरचे लोणी खाण्याचा कारभार सुरू आहे.