नगर – गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात गावकीचे राजकारन तापले असून, 705 ग्रामपंचायतींच्या 5 हजार 788 जागांसाठी आज मतदान प्रक्रियापार पडली. आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. दुपारी साडेतीन वाजताच्या मिळालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 705 ग्रामपंचायतींसाठी 71.46 टक्के मतदान झाले होते. यात 10 लाख 8 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दरम्यान, 13 हजार 194 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
पहिल्या टप्प्यात सकाळी 9.30 पर्यंत मतदानाचा वेग कमी होता. या काळात अवघे 12 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर साडेअकारापर्यंत 31 टक्के झाले होते. मात्र, दुपारी दीड वाजेपर्यंत त्यात वाढ होवून जिल्ह्यात सरासरी 52 टक्के मतदान झाले होते. दुपारी साडेतीन वाजता मतदानाची टक्केवारी 71.46 वर पोहचली.
सकाळी काहीसे धीमी असणारी मतदानाची प्रक्रिया दुपारी 12 नंतर वेगवान झाले. मतदारांनी केंद्राबाहेर रांगा लावल्याचे चित्र अनेक ग्रामपंचायतींमध्ये दिसून आले. दुपारी साडेतीन वाजता मिळालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 705 ग्रामपंचायतींसाठी 71.46 टक्के मतदान झाले होते. यात 10 लाख 8 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. हाच वेग दुपारपर्यंत कमालीचा वाढला होता. यात सर्वाधिक मतदान राहुरी तालुक्यात 79.86 टक्के, तर सर्वांत कमी मतदान जामखेडमध्ये 65.73 टक्के झालेले आहे.
तालुकानिहाय झालेले मतदान
अकोले 71.21, संगमनेर 72.82, कोपरगाव 70.22, श्रीरामपूर 71.61, राहाता 68.67, राहुरी 79.86, नेवासे 72.39, नगर 68.15, पारनेर 71.76, पाथर्डी 69.37, शेवगाव 74.18, कर्जत 74.50, जामखेड 65.63, श्रीगोंदा 68.73 एकूण 1008295 असे मतदान झालेले आहे.
डोंगरगण येथे तब्बल दोन तास मतदानावर बहिष्कार
नगर तालुक्यातील डोंगरगण येथे अर्धांगवायूचा झटका आलेल्या मातोश्रींना मतदान केंद्रावर घेऊन जात असताना कोणतीही विचारपूस न करता एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी मुख्याध्यापकास मारहाण केली. ही घटना सकाळी अकराच्या सुमारास घडली. या प्रकाराने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी एकत्र येत बोरसे यांच्या विरोधात मतदान प्रक्रियेवर तब्बल दोन तास बहिष्कार टाकला. त्यामुळे बराच वेळ मतदान प्रक्रिया बंद होती. प्रांताधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वातावरण शांत केले. त्यानंतर मतदान प्रक्रिया शांततेत सुरू झाली.
मतदान प्रक्रियेत 12 हजार 765 कर्मचारी
2 हजार 553 मतदान केंद्रांवर या मतदान प्रक्रियेसाठी तब्बल 12 हजार 765 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये एका मतदान केंद्रावर एक मतदान केंद्राध्यक्ष, तीन कर्मचारी, एक शिपाई होते.