पिंपरी, दि. 23 (प्रतिनिधी) -नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर शहरातील चिंचवड, रावेत, वाल्हेकरवाडी, थेरगाव, पिंपरी, काळेवाडी, दापोडी आदी सर्व ठिकाणच्या नदी घाटांना धोबी घाटाचे स्वरूप आले आहे. महापालिकेने गणेश विसर्जनाच्या वेळी राबविलेली यंत्राणा नवरात्री पूर्वी राबवली असती तर होणाऱ्या प्रदूषणाला आळा बसला असता.
पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी, मुळा नद्या वाहतात. या नदी घाटांवर सध्या सर्वत्र चादरी धुताना आणि वाळत घातलेले चित्र दिसत आहे. नवरात्रोत्सवापूर्वी घराची स्वच्छता करण्याची प्रथा आहे. त्यामुळे प्रत्येकजण घराची स्वच्छता करण्याबरोबरच घरातील चादरी, ब्लॅकेट, रजई, सतरंजी व इतर कपडे धुण्यासाठी नदीघाट गाठत आहेत. त्यामुळे नदी घाटाला धोबी घाटाचे स्वरूप आले आहेत.
सध्या पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शहरातील सर्वच नदी घाटांवर कपडे वाळतानाचे चित्र दिसत आहे. कपडे धुण्यासाठी घेऊन आलेली वाहनेही या पात्रात धुतली जात आहेत. कपडे धुतल्याने पाण्याचे प्रदूषण तसेच नदीपात्रात वाहने धुतल्याने त्यांचे ऑइल, डिजेल यामुळे पाण्यावर तेलाचा तवंग दिसत आहेत. त्यामुळे नदीपात्र प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे.
गणेशोत्सवासारखी यंत्रणा राबवावी
अनंत चतुर्थीला महापालिकेने चांगली यंत्रणा राबविली. अनंत चतुर्थीला थेट नदी पात्रात मूर्तींचे विसर्जन करण्यास बंदी घातली. महापालिकेने तसेच प्रभागातील अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांनी विसर्जनासाठी कृत्रिम हौद उपलब्ध करून दिले. त्यामुळे नागरिकांनी त्यातच आपल्या मूर्तींचे विसर्जन केले. तसेच निर्माल्य नदीपात्रात न टाकता ते जमा केले. त्याने नक्कीच नदी पात्रातील पाण्याच्या प्रदुषणात घट झाली. अशीच दक्षता नवरात्रीपूर्वी घेतली असती तर, नदी प्रदषण आणखी कमी होण्यास मदत झाली असतील.
कारवाईची गरज
गणेशोत्सवानंतर पवना, इंद्रायणी, मुळा नदीपात्रात वाहने, कपडे धुणे तसेच निर्माल्य व कचरा टाकला जात आहे. अनेक ठिकाणच्या नदी घाटावर हे निर्माल्य पसरल्याचे दिसत आहे. त्याकडे महापालिका प्रशासन व पर्यावरण विभाग दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे नद्यांचे प्रदूषण वाढत असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नदी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाईची गरज आहे.