पिंपरी, दि. 23 (प्रतिनिधी) -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेत निर्माण होणारा ओला आणि सुका कचरा त्याच ठिकाणी वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी शून्य कचरा शाळा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुध्दा शाळेतच ओला आणि सुका कच-याची विल्हेवाट लावण्याचे धडे मिळणार आहेत. तर, ओला आणि सुका कचरा निर्माण होऊ नये, यासाठी काय करायला हवे, याचा देखील परिपाठ त्यांना घेतला जाणार आहे.
शिक्षण विभागाचा शाळा स्वच्छतेसाठी उपक्रम
महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयातील प्रत्येकी एक अशा एकूण आठ प्राथमिक शाळांध्ये आसरा सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून शून्य कचरा शाळा उपक्रम राबविण्यात येत आहे. शाळेत निर्माण होणारा ओला आणि सुका कचरा त्याच ठिकाणी वर्गीकरण करून तो जिरवण्यासाठी शाळा पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. प्रथामिक शाळेत विद्यार्थ्यांनी मध्यान्ह भोजन घेतल्यानंतर वाया गेलेले अन्न पक्षांचे खाद्य म्हणून वापरले जाणार आहे. त्याठिकाणी स्वच्छ जागेत ते अन्न पक्षांसाठी ठेवण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे वाया जाणारे अन्न पक्षांसाठी उपयोगी ठरणार आहे. सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी शाळा परिसरात कंपोस्ट खड्डे खोदून त्यात हा कचरा जिरवला जाणार आहे. त्या कचऱ्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती होऊन त्याची विक्री केल्यानंतर येणारे पैसे शाळेच्या विकासासाठी वापरण्याचे प्रयोजन आहे.
प्लॅस्टिक ड्रम, पाण्याच्या बाटल्या, फुटके पेन, रबर, टाकाऊ कपडे, वापरातील कागद, लोखंड आदी भंगार कचरा संकलन करण्याची स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. टाकाऊपासून टिकाऊ अशा उपक्रमासाठी ते साहित्य उपयोगात आणले जाणार आहे. तर, उपयोगात न येणारे भंगार साहित्य बाजारात विक्री केले जाणार आहे. प्लॅस्टिक बाटल्या शाळेत आणण्यास मनाई केली जात आहे. त्यामुळे प्लॅस्टिकचा कचरा निर्माण होण्यास प्रतिबंध बसत आहेत, अशी माहिती आसरा सोशल फाऊंडेशनच्या अर्चना मोरे यांनी दिली.
स्वच्छतेची जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वतः घेतली पाहिजे. त्यासाठी आठ शाळांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही प्रगती पाहून पुढील शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे.
संदीप खोत, उपायुक्त