नगर – जिल्ह्यात “माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेचा 25 ऑक्टोबरला समारोप होईल. या मोहिमेसाठी जिल्ह्यात एकूण 1 हजार 617 पथकांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाची माहिती घेतली जात आहे. करोनादूत घरोघरी जाऊन हे काम करत आहेत. मात्र, केलेल्या सर्वेक्षणाची माहिती वेळेवर पोर्टलवर अपलोड करणे अत्यावश्यक असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले.
दूरदृश्य प्रणालीद्वारे तालुकास्तरीय यंत्रणांशी आज जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी संवाद साधला. त्यात “माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेचा त्यांनी आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा
सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके यावेळी उपस्थित होते.
तालुकास्तरावरून सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी या आढावा बैठकीत सहभागी झाले होते. करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने “माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू केली आहे.
या मोहिमेने आता जिल्ह्यात गती घेतली असून, गावोगाव करोनादूत जावून सर्वेक्षण करत आहेत. तालुकास्तरीय यंत्रणांनी ही माहिती वेळेवर पोर्टलवर अपलोड करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी आज दिल्या.
अँटिजेनसोबतच आरटीपीसीआर चाचणी
अँटिजेन चाचणी करतानाच लक्षणे जाणवणाऱ्या रुग्णांचे घशातील दोन वेगवेगळे स्त्राव घेण्यात यावेत. त्यातील एक आरटीपीसीआर चाचणीसाठी पाठवावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात करोनाची लक्षणे जाणवणाऱ्या रुग्णांपर्यंत पोचण्यासाठी चाचण्यांची संख्या अजून वाढविण्याची गरज आहे. जिल्हा रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅबची क्षमता वाढविली आहे. त्यामुळे अँटिजेन चाचण्यांबरोबरच रुग्णांचे घशातील स्त्राव नमुने आरटीपीसीआर लॅबमध्ये पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.