ग्रामपंचायतीकडून पाणीपट्टीत तीनपट वाढ ः ग्रामस्थांना विश्वासात न घेता परस्पर घेतला निर्णय फ
वाघळवाडी – मुरुम (ता. बारामती) ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना विश्वासात आणि कोणतीही पूर्व सूचना न देता सार्वजनिक आणि वैयक्तिक नळ पाणीपुरवठ्याच्या पाणीपट्टीत वाढ केल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. गेल्या 10 वर्षांपासून काही ग्रामस्थांनी पाणीपट्टी व घरपट्टी भरलेली नाही. त्यावर काहीही कारवाई न करता त्यांना सुट दिली जात आहे. याउलट जे ग्रामस्थ प्रामाणिकपणे ग्रामपंचायतीला कर भरतात त्यांना मात्र नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
शासनाच्या नियमानुसारच पाणीपट्टीत वाढ केली असून ग्रामसभा अथवा मासिक बैठकीत यावर निर्णय घेण्याची आवश्यकता नाही. कित्येक वर्षांपासून यामध्ये वाढ झाली नव्हती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामस्थांनी थकित घरपट्टी आणि पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे.
– प्रकाश सोनवणे, ग्रामसेवक मुरुम
नीरा डावा कालवा आणि नीरा नदीच्या मध्यभागी असलेल्या आणि पाणी उपलब्ध असूनही मुरुम गावातील वाड्यावस्त्यांवरील ग्रामस्थांना दोन ते तीन दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही. ज्या नळांना गेल्या कित्येक महिने आणि वर्षात पाणीच आले नाही आशा ग्रामस्थांनी पाणीपट्टी का भरावी असा सवाल उपस्थित होत आहे. ग्रामसभा अथवा सदस्यांच्या मासिक बैठकीतही पाणीपट्टी वाढविण्याबाबत चर्चा झाली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
मुरुम ग्रामपंचायतीकडे पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक अशी सुमारे 1 हजार नळ कनेक्शन आहेत. सुमारे 13 लाखांच्यावर थकित पाणीपट्टी आणि 11 लाख रुपयांच्यावर घरपट्टी थकित असतानाही ती वसूल करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून ही कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. दिवाबत्ती, घरकुल योजना, मुद्रांक योजना, पिण्याचे पाणी यांच्या शिवाय इतर योजना आणि मूलभूत गरजा देण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
पण याबाबत प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. मुरुम ग्रामपंचायतीने पाणीपट्टी वाढीचा परस्पर निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका नियमित पाणीपट्टी भरणाऱ्यांना आहे. त्यामुळे नागरिकांनी या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
तसेच हा निर्णय घेताना नागरिकांना पंचायतीच्या प्रशासनाने विश्वासात घेतले नाही. प्रशासनाच्या या अनागोंदी कारभाराबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून करवाढ मागे घ्यावी अशी मागणी देखील केली आहे.