मुंबई – 3 नोव्हेंबरला होणाऱ्या अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तसेच काही कारणाने लटके यांनी अर्ज मागे घेतला तर सावध भूमिका म्हणून ठाकरे गटाकडून संदीप नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
दरम्यान, संदीप नाईक यांनी भाजप उमेदवार मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला आहे. त्यांनी निवडणुक आयोगाला पत्रव्यवहार केला असून पटेल यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली आहे.
नाईक यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, मुरजी पटेल यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खोटे कागदपत्र सादर केल्यामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने सहा वर्षांकरिता निवडणूक लढण्यास अपात्र ठरविले आहे. असे असताना त्यांचा निवडणुकीचा अर्ज कोणत्या नियमानुसार स्वीकारण्यात आला. मी दिलेल्या माहितीची शहानिशा करून पटेल यांचा अर्ज रद्द करा, असे नाईक यांनी म्हंटले आहे.
यावर निवडणुक आयोग काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सध्या भाजप व शिवसेना शिंदे गट विरूद्ध शिवसेना ठाकरे गटाने निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. दोन्ही पक्षाचे उमेदवार मतदारसंघात फिरून ज्येष्ठांचा आशिर्वाद घेत आहेत.