पुणे – किरकोळ वादाच्या कारणातून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने कोयत्याने हाता-पायावर वार करून एका व्यक्तीच्या खूनाचा प्रयत्न केला. ही घटना 25 ते 26 मे या कालावधीत आंबेडकरनगर मार्केटयार्ड येथे घडली.
याप्रकरणी, लक्ष्मी चव्हाण (वय.55, रा. आंबेडकरनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार एक महिला व पाच पुरूष अशा सहा जणांच्या विरुद्ध मार्केटयार्ड पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तर ईश्वर दत्ता चव्हाण (वय.39) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सर्वात गंभीर प्रकार म्हणजे आरोपींनी पोलिसांच्या अंगावर धावून जात त्यांना देखील धक्काबुक्की केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची मुले ईश्वर व कृष्णा यांच्यात घरगुती कारणातून वाद सुरू होते. त्यावेळी त्यांच्या घरासमोर राहणारे आरोपी यांनी काठीने कृष्णाला मारहाण केली.
दरम्यान फिर्यादी ह्या घाबरून त्यांच्या घराला आतून कडी लावून बसल्या होत्या. आरोपींनी तुम्ही बाहेर या तुम्हाला दाखवतो असे धमकावून लोखंडी गजाने दरवाज्याच्या कडीला बाहेर लावून त्यांना आत कोंडले. भांडण सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन कडी काढून सर्वांना बाहेर काढले. त्यावेळी आरोपींनी पोलिसांसोबत वाद घालून त्यांना धक्काबुक्की केली होती.
त्यानंतर आरोपींनी बुधवारी (दि.26) रात्री 9 च्या सुमारास फिर्यादी यांचा मुलगा ईश्वर त्यांच्या घराजवळ थांबला असताना, आरोपींनी त्याच्यासोबत झालेल्या किरकोळ वादाच्या कारणातून त्याच्यावर कोयत्याने वार केले. हाता-पायावर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ए.व्ही.कदम करीत आहेत.