कराडला उपक्रमास प्रारंभ
कराड (प्रतिनिधी) – सर्वांच्या लाडक्या गणरायाचे शनिवारी मोठ्या उत्साहात आगमन झाले. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कराड पालिकेने नेटके नियोजन केले आहे. दीड दिवसांच्या गणरायांना रविवारी दुपारी भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. गणेश विसर्जनसाठी नदीपात्रात गर्दी होऊ नये याची दक्षता घेण्यात आली आहे. विसर्जनसाठी “पालिका आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. पालिकेच्या गाड्या प्रत्येक प्रभागातून फिरणार आहेत. तसेच कृष्णा घाटावरही सोय करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली.
कराड शहरात गेल्या काही दिवसांपासून करोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. प्रत्येक गल्ली बोळात करोनाचे रूग्ण आढळून येत आहेत. त्यातच गणेशोत्सव सुरू झाला आहे. उत्सवप्रियतेमुळे अनेकजण एकत्रित येण्याची शक्यता जास्त असते. त्यातून करोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. यासाठी प्रशासनाने गणेश मंडळांना सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्याला मंडळांनीही प्रतिसाद दिला आहे.
शहरातील अनेक मंडळांनी नेहमीप्रमाणे स्टेज न उभारता मंडळाच्या अध्यक्षांच्या घरात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. गणेश आगमनानंतर लगेच दुसऱ्या दिवशी दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होते. त्यानंतर पाच, सात व दहा, बारा दिवसांनी गणेश मूर्तींचे विसर्जन होते. येथील कृष्णा व कोयना नदीपात्रावर अनेक नागरिकांची विसर्जनासाठी गर्दी होते. मात्र, यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने नदीपात्रावर येण्यास लोकांना मज्जाव केला आहे. तेथे फक्त पालिका कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांनी आणलेल्या मुर्तींचे विसर्जन करणार आहेत.
तसेच प्रत्येक प्रभागामध्ये पालिकेचे वाहन फिरणार आहे. त्यासाठी 28 वाहनांचे नियोजन करण्यात आले असून पालिकेचे शंभर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय शहरात 19 ठिकाणी कृत्रिम तलाव व 2 शेततळी बांधण्यात आली आहेत. त्यातही अनेक नागरिक गणेशमूर्तींचे विसर्जन करू शकतात, नागरिकांनी पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी डाके यांनी केले आहे.