पुणे – मागील वर्षी पावसाळ्यातही महापालिकेकडून शहरात रस्ते खोदाईस मुभा देण्यात आली. परिणामी ऐन पावसाळ्यात शहरातील रस्ते खड्ड्यांत गेले. पावसाळा संपताच महापालिकेने शहरात रस्ते दुरुस्ती हाती घेत 350 कोटींहून अधिकची कामे वर्षभरात केली. मात्र रस्ते खड्डेमुक्त करताना पथ विभाग आणि ड्रेनेज विभागात समन्वय न ठेवल्याचा फटका यंदा पुणेकरांना बसण्यास सुरुवात झाली आहे. हे रस्ते करताना ठेकेदारांनी चक्क पावसाळी पाण्याची चेंबरच बुजविली आहेत.
विशेष म्हणजे ही चेंबर कोणत्या ठिकाणी आहेत, याची साधी नोंदही पालिकेकडे नसल्याने आता ही चेंबर शोधता येत नाहीत. परिणामी मागील वर्षी खड्ड्यांमुळे हवाई प्रवासाचा अनुभव घेणाऱ्या पुणेकरांना यंदा रस्त्यावर साचणाऱ्या तळ्यांमुळे जलप्रवास करावा लागणार आहे. दरम्यान, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी रविवारी शहरात झालेल्या पहिल्याच पावसाने पाणी साचलल्या भागाची पाहणी केली. त्यावेळी पावसाळी चेंबर रस्त्याच्या कामात बुजविण्यात आले असल्याचे निदर्शनास आहे. प्रामुख्याने शहराच्या पेठा, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, शिवाजी रस्ता या प्रमुख रस्त्यांसह, त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांसह, कर्वे रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्गसन रस्ता, बिबवेवाडी भागातील रस्त्यांचा यात समावेश आहे.
मार्ग बुजविल्याने पाणी रस्त्यावरच
महापालिकेने शहरात सुमारे 250 ते 275 किलोमीटरच्या पावसाळी जलवाहिन्या प्रमुख रस्त्यांच्या बाजूला टाकल्या आहेत. शहराच्या अंतर्गत भागात पावसाळी पाणी थेट ड्रेनेजमध्ये जाईल, अशा पद्धतीने पावसाळी लाइन ड्रेनेजला जोडल्या आहेत. प्रशासनाकडून गेल्या काही वर्षांत शहरात झालेल्या पावसाचा अभ्यास करून एका वेळी 55 मिमी पाऊस झाल्यास पाणी वाहून जाईल, अशा क्षमतेच्या पावसाळी लाइन आणि चेंबर तयार केले होते. मात्र, यावर्षी शहरात झालेल्या अवघ्या 30 ते 35 मिमी पावसातच या पावसाळी वाहिन्या भरून वाहिल्या आहेत. त्यातच चेंबरची पूर्ण क्षमतेने स्वच्छता न झाल्याने चेंबरही पावसाळ्यात भरून वाहिले आहेत. त्यातच आता थेट पावसाळी चेंबरच बुजविल्याने पाणी रस्त्यावरच अडून राहत आहे.
रस्त्यांच्या कामात पावसाळी चेंबर बुजले असल्याचे निदर्शनास आले आहे. पावसाळ्यात रस्त्यांवर खोदाई करून ते दुरुस्त करणे शक्य नाही. त्यामुळे ज्या भागात पाणी साचत आहे त्या भागासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमून पाणी निचरा करण्याच्या सूचना केल्या आहेत, असे महापालिकाचे अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार म्हणाले.