नगर -जिल्हा रुग्णालयातील करोना टेस्ट लॅबमध्ये सात व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात या व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत. यात एका रुग्णाचा 10 दिवसांनंतरचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी नगरची चिंता वाढवली असून, जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या 80 वर पोहचली आहे.
दरम्यान अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे आलेल्या घाटकोपर येथील व्यक्तीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय, जिल्ह्यातील पाच व्यक्ती करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा येथील 31 वर्षीय, श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील 33 वर्षीय, अकोले तालुक्यातील ढोकरी येथील 35 वर्षीय पुरुष, श्रीगोंद्यासह नगर तालुक्यातील वाकोडी येथील 43 वर्षीय पुरुष आणि निंबळक येथील 30 वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली आहे.
याशिवाय सुभेदारगल्ली येथील करोनाबाधित व्यक्तीचा दहा दिवसांनंतरचा स्त्राव चाचणी अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. घाटकोपर येथून लिंगदेव (अकोले) येथे आलेल्या एका व्यक्तीचा खासगी प्रयोगशाळेत अहवाल पॉझिटिव्ह आला होता. जिल्हा रुग्णालयाने त्याची पुन्हा येथे चाचणी केली असता, तो बाधित असल्याचे आढळून आले आहे. वडाळा महादेव येथे बाधित आढळून आलेली व्यक्ती ही काल बाधित आढळलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील आहे. इतर बाधित व्यक्ती त्यांना आजाराची लक्षणे जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले होते. ते अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.
तहसीलदारांनी सुरक्षा समितीला बजावली नोटीस
तालुक्यातील निंबळक येथे रेड झोनमधून येणाऱ्या नागरिकांना शाळेत विलगीकरण कक्षामध्ये दाखल न केल्यामुळे तहसीलदार उमेश पाटील यांनी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहेत. “रेड झोन’मधून आलेले नातेवाईक निंबळकमध्ये दाखल झाले आहेत. मात्र, काही ठराविक नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे, असे निदर्शनात आले. याबाबत भरारी पथकाने पाहणी करून ग्रामसुरक्षा समितीस बजावले होते. नागरिक क्वारंटाईन होत नसतील, तर ग्रामसुरक्षा समितीने संबधितांना नोटिसा बजावाव्यात. तसेच नोटिशीची दखल घेतली नाही, तर आश्रय देणाऱ्या व बाहेर येणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र या समितीने गुन्हे दाखल करण्यास हालगर्जीपणा केला असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या समितीला तहसीलदार यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
दिवसभर विलगीकरणात; रात्री गावात
बाहेरुन आलेल्या नागरिकांना गावातच विलगीकरण कक्षात ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत. त्यासाठी गावागावांत सुरक्षा समिती स्थापन करून सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांच्या निगराणीखाली नागरिकांना ठेवण्यात येते. मात्र, या समितीच्या दुर्लक्षामुळे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले अगंतुक दिवसभर संबंधित ठिकाणी थांबतात. मात्र, रात्री मित्र परिवारासोबत तसेच गावातील नातेवाईकांकडे राहतात. त्यामुळे अनेक गावांत करोना शिरकाव करत आहे. त्यामुळे प्रशासनानेही लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
जावयांमुळे गावात आला करोना
मुंबई, पुणे व इतर शहरांतून सध्या अनेक जण आपल्या गावांकडे येत आहेत. अनेक जावईही आपल्या सासूरवाडीस येत आहेत. या जावयांमुळेच गावात करोना येत असल्याची भावना आता गावकऱ्यांची होऊ लागली आहे. पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथे करोनाबाधित जावयाचा मृत्यू झाला आहे. तसेच म्हसणे फाटा येथे आलेला जावई करोनाबाधित आढळून आला आहे. राहाता तालुक्यातही एक जावई करोनाबाधित आढळल्याने त्यास त्याच्या मूळ गावी पाठवून देण्यात आले.