Mumbai-Pune Expressway – मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच आठपदरी होणार आहे. यासंदर्भात रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) राज्य सरकारला प्रस्ताव सादर केला आहे. वाहनांची संख्या प्रचंड वाढल्यानं एक्स्प्रेसवेवर वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्या पार्श्वभूमीवर हा मार्ग आठ पदरी करणाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास वर्षभरात कामाला सुरुवात होऊ शकेल.
तीन वर्षांत काम पूर्ण करणार –
महत्त्वाची बाब म्हणजे, राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर काम सुरू झाल्यापासून पुढच्या तीन वर्षांत मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आठ पदरी करण्याचे काम पूर्ण करण्याचा रस्ते विकास महामंडळाचा मानस आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेची क्षमता वाढणार आहे. त्यामुळे मुंबई, पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न दूर होण्यास मदत होणार आहे.
राज्यातील महत्वाच्या मार्गांपैकी एक मुंबई-पुणे महामार्ग –
यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्सप्रेसवे 94.5 किलोमीटर लांबीचा आहे. मुंबई आणि पुणे या दोन महानगरांमधील अंतर कमी करण्यासाठी मुंबई-पुणे महामार्ग बांधण्यात आला होता. वर्ष 2002 मध्ये हा महामार्ग पूर्णपणे कार्यान्वित झाला. या महामार्गामुळे चार ते पाच तासांचा मुंबई-पुण्याचा प्रवास अवघ्या दोन ते अडीच तासांत पूर्ण करता येतो. राज्यभरातील सर्वात महत्त्वाच्या महामार्गांपैकी मुंबई-पुणे महामार्ग एक समजला जातो.
दररोज 1 लाख 55 हजार वाहने धावतात –
या महामार्गावरुन दररोज तब्बल एक लाख 55 हजार वाहने धावतात. मात्र आता या महामार्गाचा वापर वाढू लागला असून यावर वाहनांची वर्दळ वाढू लागली आहे. तसेच, अनेकदा या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडीही पाहायला मिळते. त्यामुळे या मार्गाचे लवकरच आठपदरी करण्याचे काम सुरू होणार आहे.