विश्रांतवाडी (प्रतिनिधी) : महामार्गावरील वाहतुकीस शिस्त लागावी व अपघातांची संख्या कमी व्हावी याकरिता प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने मुंबई-पुणे महामार्गावर आज पासून “विशेष तपासणी मोहीम” तसेच चालकांसाठी जनजागृती व प्रबोधन मोहीम राबविण्यात येणार आहे असे पुणे परिवहन कार्यालयाचे मुख्य अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी सांगितले.
पुणे-मुंबई महामार्ग तसेच पुणे-बेंगलोर महामार्ग या महामार्गांवर मोठ्या प्रमाणात अपघात होण्याचे प्रकार वाढत असून अपघातांची संख्या वाढत आहे. या अपघातामध्ये मोठ्या संख्येने नागरिक मृत्यूमुखी पडत आहेत. चालकांच्या निष्काळजीपणामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. या अपघातांना आळा बसावा किंवा ते कमी व्हावे या हेतूने ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
विशेष मोहिमेसाठी प्रमुख अधिकारी तसेच समन्वयक म्हणून मोटार वाहन निरीक्षक निलेश बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुणे विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी याविषयीची सविस्तर माहिती दिली. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आर. एम. पाटील उपस्थित होते
ही मोहीम सहा महिने 24 तास चालणार असून यामध्ये चालकांनी सीट बेल्ट न लावणे, अति वेगाने वाहन चालवणे, लेन न बदलणे अशा विविध प्रकारचे नियम न पाळणे यासाठी महामार्गावर विशेष प्रकारे जनजागृती तसेच प्रबोधन करण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड तसेच पनवेल आरटीओचे बारा पथक कार्यरत असणार आहेत या पथकांमध्ये 48 अधिकारी आणि कर्मचारी 24 तास सेवा देणार आहेत.
या विशेष उपक्रम अंतर्गत करण्यात येणारे उपाय योजना…
1. अपघात ग्रस्त ठिकाणांचे सर्वेक्षण करणे त्या ठिकाणी रस्ता सुरक्षेच्या हेतूने सर्व उपाययोजना करणे
2. वाहन चालकांच्या माहितीकरिता येथे घडलेल्या अपघातांची माहिती देणारे बोर्ड प्रदर्शित करणे
3. दोन्ही महामार्गावरील टोल नाक्यांवर उदघोषणा करून जनजागृती करणे.
4. चुकीच्या पद्धतीने मार्गिका बदलणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे.
5. सीट बेल्ट व हेल्मेट न लावणाऱ्या चालकांवर कारवाई करून त्यांचे प्रबोधन करणे तसेच इतर उपाययोजना करून चालकांची जनजागृती करणे.