नवी दिल्ली – भारतातील आठ मोठ्या शहरातील घरांचा दराचा आढावा घेतला असता अहमदाबाद शहरातील घराचे दर सर्वात कमी आहेत. तर मुंबईमधील घराचे दर सर्वात जास्त असल्याचे आढळून आले आहे.
सध्या भारतातील घरांचे दर तुलनेने सर्वात कमी पातळीवर आहेत आणि ग्राहकांना सध्या घर घेण्याची चांगली संधी असल्याचे नाईट फ्रॅंक या संस्थेने घरांच्या दराबाबत तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे. बऱ्याच काळानंतर भारतातील घरांचे दर सध्या कमी पातळीवर आहेत. एवढेच नाही तर घरासाठीच्या कर्जावरील व्याजदरही कमी पातळीवर असल्याचे सांगण्यात आले.
मोठया शहरामध्ये घर खरेदी करण्यासाठी किती रकमेचा हप्ता द्यावा लागेल याचा अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. एखाद्या व्यक्तीला घराचा हप्ता देण्यासाठी त्याच्या उत्पन्नाच्या 40 टक्के पेक्षा कमी रक्कम लागते ते घर स्वस्त समजले जाते. तर पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम हप्ता देण्यासाठी वापरली जात असल्यास ते घर संबंधित नागरिकाला महाग पडते असे समजले.
दिल्लीत हे प्रमाण 2021 मध्ये केवळ 28 टक्के इतके होते. अहमदाबाद मध्ये हे प्रमाण केवळ 20 टक्के तर पुण्यात हे प्रमाण 24 टक्के आहे. फक्त मुंबई शहरात हे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा जास्त असून तेथे हे प्रमाण 53 टक्के असल्याचे या अहवालात म्हटले आहे. हैदराबाद शहरात हे प्रमाण 29 टक्के, बंगळुरूत 26 टक्के व चेन्नई आणि कलकत्त्यात 25 टक्के इतके असल्याचे सांगण्यात आले.
हा अहवाल तयार करताना घराच्या किमती, व्याजदर, नागरिकांचे सर्वसाधारण मासिक उत्पन्न इत्यादी बाबींचा आढावा घेतला जातो.