नारायणगाव -लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर बंद पडलेल्या खेडघाट बायपास रस्त्याचे काम सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी (दि.7) संपूर्ण 4.4 किलोमीटर लांबीच्या बायपास रस्त्याची पायी चालत पाहणी, कामाचा आढावा घेतला.
रस्त्याचे सुमारे 3.4 किमी लांबीचे काम जवळपास पूर्ण झाले असून उर्वरित 1 किमी लांबीतील मोठ्या पुलाचा अर्धा स्लॅब पूर्ण झाला आहे. उर्वरित काम अडीच महिन्यांत पूर्ण करून सप्टेंबरपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.
डॉ. कोल्हे यांची तुकाईवाडी व भांबूरवाडी परिसरातील ग्रामस्थांनी अनिल राक्षे, वैभव घुमटकर यांच्यासमवेत भेट घेतली. तुकाईवाडीजवळच्या संभाव्य जंक्शनच्या कामाबाबत ग्रामस्थांचे म्हणणे जाणून घेतले. लवकरच ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे बैठक घेऊन सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे बायपास रस्त्याच्या कामाची स्वतंत्र निविदा प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या टप्प्यात नारायणगाव व खेडघाट बायपास रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू झाले.