नारायणगाव -शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवजयंतीच्या दिवशी किल्ले शिवनेरीवर होणाऱ्या शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार घातला असून भगवं आंदोलन करणार आहे. हे आंदोलन म्हणजे कुणाचा निषेध अथवा विरोध नसून शासनाला जाणीव करून देण्यासाठी भगवं आंदोलन करीत आहे.
एवढी वर्षे झाली तरी शिवनेरीवर भगवा ध्वज नाही. शिवनेरीवर भगवा ध्वज लावण्यात यावा यासाठी केंद्रीय मंत्र्यांना भेटलो, संसदेच्या पटलावर मागणी ठेवली, राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर बोलताना आग्रही मागणी केली. संसदेच्या अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी बोलविलेल्या खासदारांच्या बैठकीत जाणीव करून दिली होती.
भगवा ध्वज आमची अस्मिता आहे.
शिवभक्तांचा मोठा गर्व आहे, भावना आहे याचा आदर करून राज्य सरकारने शिवनेरीवर भगवा ध्वज लावण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रही मागणी करून पाठपुरावा करावा असे सांगितले होते; परंतु त्यातून काही निष्पन्न होत नाही. ठोस पाऊलं उचलले जात नाही. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावर कायमस्वरूपी भगवा नाही याची जाणीव करून देण्यासाठी शिवनेरीवर शिवजयंतीच्या दिवशी होणाऱ्या शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार घातला असल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
शिवरायांचा सन्मान का नाही?
शिवजयंतीच्या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर मी जाणारच; परंतु शासकीय कार्यक्रम चालू असताना ज्या शिवभक्तांना अडवून ठेवले जाते त्या शिवभक्तांबरोबर खांद्यावर भगवा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. जे केंद्र सरकार 370 कलम हटवते, तेच केंद्र सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान का करू शकत नाही? असा प्रश्न विचारला. म्हणूनच भगवा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.