अंजिराचा हंगाम सुरू : खट्टा हंगामातून पिचलेल्या शेतकऱ्यांना मिठा बहर
दिवे – पुरंदर तालुक्यातील अंजिरचा मीठा हंगाम सुरू झाला आहे. सध्या खट्टा बहारमधून तावूनसुलाखून निघालेल्या शेतकऱ्यांना मीठा अंजिरचा बहार गोडी वाढविणारा ठरला आहे. मुंबई बाजारपेठेत दर चांगला मिळत असल्यामुळे पावसाळ्यात पिचलेल्या अंजीर उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. 48 नगाला 250 ते 300 रुपये भाव मिळत आहेत. हा हंगाम आता मेअखेरपर्यंत चालणार आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक अंजिर उत्पादन हे पुरंदर तालुक्यात होते. यात दिवे, सोनोरी, वनपुरी, उदाचीवाडी, सिंगापूर, वाघापूर, पिंपळे, भिवडी ही प्रमुख गावे अंजीर उत्पन्नात अग्रेसर आहेत. हवेली तालुका आणि खेड- शिवापूर परिसरात वेळू, गोगलवाडी परिसरात अंजीराचे उत्पादन घेतले जाते. अंजीर उत्पादन पावसाळी व उन्हाळी अशा दोन्ही हंगामात घेतले जाते. पावसाळी हंगामात खट्टा बहार असतो. उन्हाळी हंगामात मीठा हंगाम असतो. पावसाळ्यात सप्टेंबर, आक्टोंबरमध्ये हंगाम सुरू होतो. यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त होते.
त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वारंवार औषध फवारणी करूनही अंजीर बागांवर करप्या व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यामुळे बाजारभावात सतत चढ- उतार होत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना बराच आर्थिक फटका बसला होता. काही शेतकऱ्यांनी अंजीर बागा काढून टाकल्या होत्या. पावसाळ्यात अंजीरचा भाव 250 रुपयांवरून 70 रुपयांवर येऊन ठेपला होता. त्यावेळी शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता.
मीठा हंगामात अंजिरचा उत्पादन खर्च कमी येतो. औषध फवारणीचा खर्च कमी आहे. फळाला रंग, आकार आणि चव चांगली असते. परिणामी बाजारभावही चांगला मिळतो. परंतु उन्हाळ्यात विहिरींची पाणीपातळी खालावत आहे. त्याची झळ शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे. उन्हाळ्यात तिसऱ्या दिवशी बागेला पाणी द्यावे लागत आहे. काही अंशी पुरंदर उपसा जलसिंचन योजनेमुळे काही भाग ओलिताखाली आला आहे.
तथापि पश्चिमेकडील चिंचवलेवस्ती दरा परिसरात पुरंदर उपसाचे पाणी पुरेशा प्रमाणात व वेळेत मिळत नाही, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे मिठ्ठा हंगामाचे उत्पादन घेता येत नाही. यासाठी पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे नियोजन होणे गरजेचे आहे.
यावर्षी एक एकर बागेसाठी एक लाख रुपये खर्च केले आहेत. परंतु अवकाळी पाऊस पडल्यामुळे दररोज तोडणी केलेला माल पन्नास टक्के जागेवरच फेकून द्यावा लागत होता. मुंबई बाजारात माल पोहोचेपर्यंत तो टिकत नव्हता. त्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा निघाला नाही.
– आबासाहेब झेंडे, अंजीर उत्पादक शेतकरी, दिवे.
आम्ही शेतात शंभर बाय शंभरचे शेततळे उभारले आहे. पाटील वस्ती येथून तीन किलोमीटर अंतरावर पाइपलाइन केली आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामात अंजीर उत्पादन घेतो. सध्या नुकताच हंगाम सुरू झाला आहे. सध्या बाजारात मागणी चांगली असल्याने बाजारभाव चांगला मिळत आहे.
– कैलास झेंडे, अंजीर उत्पादक शेतकरी, दिवे.