फलटण – नीरा देवघर धरणाचे 55 टक्के पाणी पुन्हा डाव्या कालव्याद्वारे बारामतीकडे वळविण्याच्या निर्णयाची संपूर्ण माहिती मागवली असून सर्व माहिती घेऊन यावर मी माझे मत व्यक्त करेन, असे विधान परिषदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले. तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी न्यायालयात दाद मागण्याचा आणि रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.
नीरा देवघर धरणाच्या कार्यक्षेत्रात भोर, खंडाळा, फलटण, माळशिरस, सांगोला हे तालुके येतात. मात्र नीरा- देवघर कालव्यांची कामे अपूर्ण असल्यामुळे यातील 60 टक्के पाणी पूर्वी नीरा डाव्या कालव्याद्वारे बारामती, इंदापूरला तर 40 टक्के पाणी नीरा उजव्या कालव्याद्वारे खंडाळा, फलटण, माळशिरसकडे जात होते. माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खासदारकीची निवडणूक जिंकताच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून हक्काचे पाणी निरा उजव्या कालव्यामार्फत वळवून बारामती, इंदापूरला जाणारे पाणी बंद केले होते.
विधानसभा निवडणुकीनंतर सत्तापरिवर्तन झाल्याने महाविकास आघाडीच्या सरकारने तडकाफडकी नीरा डावा कालव्याद्वारे 55 टक्के पाणी बारामती, इंदापूरला तर 45 टक्के पाणी खंडाळा, फलटण, माळशिरसला देण्याचे जाहीर केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस वगळता इतर सर्व पक्षांनी राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. आमच्या हक्काचे पाणी आम्हाला द्या, कालव्यांची कामे त्वरित पूर्ण करा, अशा मागण्या दुष्काळी जनतेने केल्या आहेत.
नीरा देवघरच्या पाणी वाटपाबाबत काल मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयाची संपूर्ण माहिती मागवली असून सर्व माहिती घेऊन यावर मी माझे मत व्यक्त करेन, असे विधानपरिषदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले. तर यापूर्वी ज्या माढा लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी जनतेने शरद पवार यांना निवडून दिले होते, त्या जनतेचे हक्काचे पाणी पळवून पवार काका- पुतण्याने दुष्काळी जनतेचा अपमान केला आहे, त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरणार आहेच पण उच्च न्यायालयातही जाणार असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.