मुंबई – तब्बल एक वर्ष लॉकडाऊनमध्ये गेल्यानंतर आता कुठं करोना संसर्ग आटोक्यात आला होता. त्यात लस आल्याने सर्वांच टेन्शन कमी झालं होतं. करोना प्रतिबंधक लसही संपूर्ण देशात देण्यात येत आहे. त्यामुळे सर्वत्र चैतन्य निर्माण झालं होतं. मात्र आता करोना रुग्णांची वाढ होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा कडक निर्बंध लादण्यात येईल, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तर विदर्भातील नागपूर, अकोला आणि वर्ध्यात करोना रुग्णांची संख्या वाढली आहे.
नागपुरात सोमवारी 498 कोरोनाबाधित वाढलेत. शहरात तीन आणि ग्रामीणमध्ये एकाचा कोरोनाने बळी घेतला आहे. महत्वाचं म्हणजे काल 2 हजार सहाशे 35 चाचण्या झाल्या होत्या. यामध्ये 498 पॉझिटीव्ह आले असून त्याचे प्रमाण 18 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेने कारवाई अजून तीव्र केली आहे.
अकोला जिल्ह्यात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शाळा, महाविद्यालय, शिकवण्या बंद करण्यात आल्या आहेत. धार्मिक, राजकीय कार्यक्रमांनाही बंदी घालण्यात आली आहे. तर लग्न समारंभात केवळ 50 व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. तर वर्धा जिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालये राहणार बंद आहेत. वर्ध्याचे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी तसा आदेश जारी केला आहे. वर्धा जिल्ह्याची कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता महाविद्यालये बंदचा निर्णय घेण्यात आला आहे.