इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये अलिकडेच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपावरून पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देशभर आंदोलन करायला सुरुवात केली आहे.
या निवडणुकीतील गैरव्यवहार हा आतापर्यंतचा सर्वात मोठा निवडणूक गैरव्यवहार असल्याचा आरोप करून पीटीआयच्या कार्यकर्त्यांनी पेशावर-इस्लामाबाद महामार्ग रोखून धरला. या आंदोलनाला रविवारपासूनच सुरुवात झाली होती. मध्यरात्रीपासून पीटीआयच्या हजारो कार्यकर्त्यांनी हा महामार्ग रोखून धरला.
देशभरातील ८ प्रांतीय जागांसाठी आणि संसदेच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याच्या संशयावरून गेल्या ३ दिवसांपासून पीटीआयच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
पंजाब प्रांतात मोठ्या प्रमाणावर झालेच्या निवडणूक गैरप्रकारांच्या विरोधात पीटीआयने काही प्रमुख शहरांमध्ये शांततेने आंदोलन करण्याचे नियोजन केले होते. मात्र यापैकी काही आंदोलन वेळेपूर्वीच रद्द केली गेली. तरिही लाहोरसारख्या काही शहरांमध्ये आदोलन झाले होते.
पोलिसांनी पीटीआयच्या डझनभर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पीटीआयच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या ८ अपक्ष उमेदवारांच्या घरी जाऊन पोलिसांनी पीएमएल-एन पक्षाला पाठिंबा देण्याचा दबाव आणल्याचा आरोपही काही कार्यकर्त्यांनी केला आहे.
दरम्यान सिंध प्रांतातील अन्य राजकीय पक्षांनीही निवडणूक गैरप्रकाराचा आरोप केला आहे. सिंध प्रांताच्या निवडणूक मुख्यालयाबाहेर पीटीआयने जोरदार निदर्शने केली.
याशिवाय जमात उलेमा-ए-इस्लाम-फझलने सिंध प्रांतातील रस्त्यांवरील वाहतूक रोखून धरली आणि जमात-ए-इस्लामीने कराचीच्या विविध भागात धरणे आंदोलन केले.
पाकिस्तान पीपल्स पार्टीला फायदा होण्यासाठी निवडणुकीमध्ये गैरप्रकार केल्याचा आरोप करत जमात उलेमा-ए-फझलच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सिंध आणि बलुचिस्तानला जोडणार् या रस्त्यावर अडथळे उभे करून वाहतूक बंद पाडली.
हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. या निवडणुकीत खोटे निकाल जाहीर केले गेले आहेत, असा आरोप जमात-ए-इस्लामीनेही केला आहे.