शिर्डी – राज्यातील सर्व श्रीमंत असणाऱ्या शिर्डीच्या साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. 17 सदस्य असलेल्या विश्वस्त मंडळासाठी राज्यभरातून तब्बल 539 जणांनी अर्ज दाखल झाले आहेत. हे सगळे अर्ज आता विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. यात अध्यक्ष पदासाठी 33, तर उपाध्यक्ष पदासाठी 27 जणांनी अर्ज दाखल केले आहे.
शिर्डीचे साईबाबा हे अवघ्या जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान या देवस्थानच्या विश्वस्त पदावर वर्णी लागावी, म्हणून अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असतात. एखाद्या राजकीय व्यक्तीच राजकीय पुनर्वसन सुद्धा विश्वस्त पद देऊन अनेकदा केल जात असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र, राजकीय व्यक्तींचा होत असलेला हस्तक्षेप पाहून सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत कोर्टात धाव घेतली आहे. यामुळेच साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त सुद्धा झाले आहे.
सध्या साईबाबा संस्थानवर औरंगाबाद उच्च न्यायालयाने नेमलेली त्रिसदस्यीय समिती कामकाज पाहत असून राज्यात नवीन सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा विश्वस्त मंडळ पदाच्या हालचालींना सुरुवात झाली आहे.
दरम्यान विधी व न्याय विभागाने मागवलेल्या 17 सदस्यीय विश्वस्त पदाच्या राज्यभरातून 539 जणांचे अर्ज साईबाबा संस्थानला प्राप्त झाले. हे अर्ज आता राज्याच्या विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. मात्र विश्वस्त मंडळ नेमताना स्थानिकांना 50 टक्के जागा द्याव्यात, अशी शिर्डी ग्रामस्थांची जुनीच मागणी आहे. यावेळी तरी ती पूर्ण करावी, अशी मागणी आता ग्रामस्थांनी पुढे आणली आहे.