कोयनानगर – कोयना भागात गेल्या महिन्यापासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या भागातील निसर्ग सौंदर्य अधिक बहरले आहे. एरवी या भागात पर्यटकांची गर्दी असते. मात्र, वन्यजीव विभागाच्या आडमुठेपणामुळे या क्षेत्रातील वर्षा पर्यटनास प्रशासनाने यंदा बंदी घातली आहे. दोन दिवसांसाठी असलेली “नो एंट्री’ बारा दिवस राहिल्याने स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पावसाळ्यात कोयना परिसरातील निसर्गा अनोखे रूप पर्यटकांना पाहायला मिळते. यामुळे आपसूकच पर्यटकांच्या तोंडून “काय झाडी…काय डोंगर…काय धबधबा…सगळे ओक्के’, असे शब्द निघतात. दोन वर्षांपूर्वी कोयना भागातील ओझर्डे धबधबा परिसरात भूस्खलन झाले. त्यामध्ये धबधब्याचे सौंदर्य अबाधित राहिले असले, तरी आजूबाजूचा परिसर धोकादायक झाला आहे.
रायगड जिल्ह्यातील इर्शाळगड येथे यावर्षी 20 जुलैला झालेल्या भूस्खलनामुळे, मुसळधार पाऊस पडणाऱ्या पर्यटन क्षेत्रांमध्ये पर्यटकांना दोन दिवसांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली होती. राज्यातील अशा इतर ठिकाणी काही अटींवर प्रवेशबंदी शिथिल करून, वर्षा पर्यटनाला परवानगी देण्यात आली आहे; परंतु कोयना क्षेत्रातील पर्यटनाबाबत प्रशासन नियमांचा बागुलबुवा करत आहे.
कोयना परिसरात अनेक धबधबे असून, प्रत्येक ठिकाणी पर्यटक निसर्गा मनमुराद आस्वाद घेतात. पर्यटकांच्या जिभेचे चोचले पुरवण्याचे काम स्थानिक लोक करतात. त्यातून त्यांना रोजगार मिळतो; परंतु गेल्या बारा दिवसांपासून येथील पर्यटनाला बंदी असल्याने ही ठिकाणे ओस पडली आहेत. त्यामुळे स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वन्यजीव विभागात “नवा राजा, नवा कायदा’
वन्यजीव विभागाचे वनक्षेत्रपाल अजित शिंदे यांची एक महिन्यापूर्वी कोयना वन्यजीव विभागात नेमणूक झाली आहे. हा पदभार स्वीकारल्यानंतर शिंदे यंनी वन्यजीव विभागात नवा कायदा राबवायला सुरुवात केली आहे.
हवामानशास्त्र विभागाने दिलेला “रेड अलर्ट’ दोन-तीन दिवसांचा असताना, वन्यजीव विभागाला हा अलर्ट वीस दिवसांचा असल्याचा साक्षात्कार झाला आहे. वन्यजीव विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे.
केवळ रेड अलर्ट असताना पर्यटनस्थळांवर दक्षता बाळगण्यात यावी; परंतु पर्यटनस्थळांवर प्रवेशबंदी करण्याचा आदेश दिलेला नाही. स्थानिक पातळीवर परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेतले पाहिजेत. वन्यजीव विभागाने केलेली कार्यवाही चुकीची आहे.
– रमेश पाटील, तहसीलदार, पाटण