सांगली : ऐन दिवाळीच्या सणात सांगलीतील टाकळी गावावर शोककळा पसरली आहे. गावातील तीन मुलींचा ओढ्यात बुडाल्याने मृत्यू झाला आहे. ऐन दिवाळीत पाडव्याच्या दिवशी टाकळी येथील जुना मालगाव रस्त्यावरील मलेवाडी ओढ्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्व गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नंदिनी देवा काळे (16), मेघा चव्हाण काळे (18) आणि स्वप्नाली टवळ्या पवार (6) अशी मयत मुलींची नावे आहेत. या मुली टाकळी येथील आंबेडकरनगर मधील पारधी वस्ती याठिकाणी राहण्यास होत्या. मिरज तालुक्यातील टाकळी याठिकाणी वस्ती असलेल्या पारधी समाजातल्या दोन तरुणींसह एक बालिकेचा ओढ्यात पोहायला गेल्या होत्या. ओढ्यात अंघोळीला गेल्यानंतर दुर्दैवी घटना घडली आहे. दुपारच्या सुमारास या तीन मुली ओढ्यात अंघोळीला गेल्या होत्या. बराच वेळ झाला तरी घरी या मुली न आल्याने त्यांच्या घरच्यांनी शोध सुरू केला.
शोध सुरू असताना ओढ्याच्या काठावर तिघींची चप्पल, कपडे पडल्याचे दिसून आल्याने पाण्यात बुडल्याची शंका आली. सदर घटनेची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना देतात घटनास्थळी पोलिस तात्काळ दाखल झाले.
अथक प्रयत्नानंतर तिघींची मृतदेह शोधून बाहेर काढला. त्यानंतर घटनास्थळी पारधी समाजाच्या महिलांचा एकच आक्रोश पाहायला मिळाला. तर ऐन दिवाळीत पाडव्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.