भैरेवाडी, पाडळोशी, माथनेवाडी ग्रामस्थ भयभीत
दाढोली-बाबरवाडी फरशी पुलास भगदाड
चाफळ – गेली आठ दिवसांपासून चाफळसह विभागात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे विभागातील डेरवण, पाडळोशी, माथनेवाडी परिसरातील डोंगर घसरण्याच्या घटना घडू लागल्याने लोक भयभीत झाले आहेत. प्रशासनाने तातडीने या ठिकाणांची पाहणी करुन योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी जनतेमधून होत आहे.
चाफळ विभाग हा दुर्गम व डोंगररांगांनी व्याप्त असा आहे. या विभागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने येथील लोकांना नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे. गेली आठभरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. शेतांमधून पाण्याचे उमाळे फुटू लागल्याने पेरणी केलेली पिके शेतात साठलेल्या पाण्यात कुजून जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. चाफळ विभागातील डेरवणनजीक असलेल्या भैरेवाडी येथे डोंगराचा काही भाग अतिवृष्टीने घसरल्याने याचा फटका शेतजमिनींना बसला आहे.
पाडळोशी विभागातही डोंगराची दरड घसरुन खाली आल्याची घटना घडली आहे. तसेच माथनेवाडी येथील भैरोबा मंदिरासमोरील डोंगराची मोठी कडा अतिवृष्टीच्या पावसाने कोसळून शेतांमध्ये कोसळली आहे. ही कडा कोसळल्यानंतर झालेला मोठा आवाज एक किलोमीटर अंतरावर असलेल्या माथनेवाडी गावात ऐकावयास आल्याने येथील ग्रामस्थांनी डोंगराच्या दिशेने धाव घेतली.
एकंदरीतच चाफळ विभागात ठिकठिकाणी डोंगराच्या कडा पडण्यासह डोंगराचा भाग खचण्याचे प्रकार सुरू असून अतिवृष्टीने भयभीत झालेल्या नागरिकांसमोर डोंगर घसरण्याचे नवीन संकट उभे राहिले आहे. अशा घटनांची नोंद शासकीय पातळीवर घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. याचा संबंधित गावच्या लोकांना कितपत धोका आहे. याचीही माहिती अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशीही मागणी विभागातील जनतेमधून होत आहे.
दरम्यान, चाफळ विभागातील दाढोली, ता. पाटण येथील फरशी पुलाला अतिवृष्टीने मोठे भगदाड पडल्याने यामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे.गेली आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दाढोली-बाबरवाडी दरम्यान असलेला फरशी पूल पाण्याखाली गेल्याने या गावाचा संपर्क तुटला आहे. फरशी पुलावरुन पाण्याचा प्रवाह सुरुच राहिल्याने या पुलाला मोठे भगदाड पडले आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.