हिंगोली (शिवशंकर निरगुडे) : हिंगोली जिल्ह्यात वानरीचे पिल्लू नुकतेच मृत झाले होते त्यामुळे वानरांचा संपूर्ण कळप शोकाकुल झाला होता आणि आजूबाजूला वानरे जमा झाले होते अग तुझे बाळ गेलय आत्ता त्याचा मोह सोड असे आजूबाजूचे वानर त्या पिल्लांच्या आईला समजवत होते. अशीच मन हेलावून टाकणारी घटना नर्सी नामदेव येथे मुक्या प्राण्याच्या बाबतीत घडली.
काही दिवसांपासून वानरांची टोळी अन्न, पाण्याच्या शोधार्थ नर्सी गावात व परिसरात दाखल झाली असून, वानरे या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत घराच्या कौलावरूनदेखील उड्या मारत आहेत. मौजमजा करत दिसेल ते पदार्थ खात आहेत. त्यातच तहान लागली तर अंगणात ठेवलेल्या रांजणातील पाणी व पित आहेत. अशातच उड्या मारत असतानाच पोटाला घट्ट पकडून बसलेले एक-दोन महिन्यांचे वानर बहुदा खाली पडले असावे, यावेळी त्या छोट्या वानराला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा दुर्दैवाने आपल्या आईच्या कुशीत प्राण गेल्याची दुःखद घटना घडली आहे.
मात्र, आपले लेकरू हे उठत का नाही, आपल्याला घट्ट का पकडत नाही, हे त्या मुक्या वानरीनीला काही केल्या उमजेना. ती पिल्लासाठी.सैरभैर झाली. आपलं लेकरू पुन्हा उठेल, याच अपेक्षेने ती लेकराला कवटाळू धरून उठवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होती. मात्र, लेकरू कोणतीही हालचाल करीत नसल्याचे पाहून वानरीने इतर वानरांना बोलावले.
अनेकजण त्या छोट्या वानराला उठविण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु, ते उठत नसल्याचे पाहून इतर वानरे निघून जात होती; पण वानरीन मात्र लेकराला उठविण्याचा प्रयत्न करतच होती. बाळा उठ, तुला काहीही झाले नाही, तू माझ्या पोटाला पकड, मी तुला झाडावर घेऊन जाते, बहुदा ती असे त्याला म्हणत असावी. परंतु, प्रकार पाहून आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मात्र भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.