खालापूर, (वार्ताहर) – वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून चांगला समाज आणि चांगली तरुण पिढी घडत आहे. तसेच वारकरी मंडळीचे समाजात मोलाचे योगदान असून तरुणाईने त्यांचे ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे, असे शिवचरित्रकार दौलत महाराज बोडखे यांनी सांगितले.
खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागामधील नावढे गावात गेल्या अनेक वर्षाची परंपरा कायम ठेवत याही वर्षी नरेश हाडप, नंदेश हाडप, निलेश हाडप यांच्या वतीने गणेश जंयती उत्साहात साजरी करण्यात आली.
या वेळी धार्मिक व समाज प्रबोधनाचे कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले होते. या वेळी झालेल्या कार्यक्रमात शिवचरित्रकार दौलत महाराज बोडखे – आळंदीकर यांच्या समाज प्रबोधनपर हरीकिर्तन झाले. या वेळी काकड आरती, श्रींची पूजा, हरिपाठ, महाप्रसाद, कीर्तन असे विविध कार्यक्रम झाले.