नवी दिल्ली – गेल्या 13 वर्षांत (2011 ते 2023) 17.50 लाख लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले आहे. हे लोक परदेशात स्थायिक झाले आहेत. हेन्ली प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट 2023 जाहीर झाला आहे. यामध्ये भारत सोडून गेलेल्या नागरिकांची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
13 वर्षात किती लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडले?
अहवालात नमूद केलेल्या आकडेवारीनुसार, 2011 मध्ये 1,22,819….. 2012 – 1,20,923….. 2013 -1,31,405…. 2014 – 1,29,328….2015 – 1,31,489…. 2016 – 1,41,603….2017 – 1,33,049……2018 – 1,34,561……2019 – 1,44,017……2020 – 85,256…… 2021 – 1,63,370…. 2022 – 2,25,620… 2023 – 87,026…. म्हणजे 13 वर्षात एकूण 17,50,466 नागरिकांनी भारतीय नागरिकत्व सोडले आहे. सदरची ही आकडेवारी 2023ची 26 जून पर्यंतची आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाकडून ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
पाकिस्तान, बांगलादेशचे नागरिकत्व घेणारे लोक –
केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने 135 देशांची यादी जारी केली आहे, जिथे 17.50 लाखांहून अधिक लोक गेले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे भारताचे नागरिकत्व सोडून अनेकांनी पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, नेपाळ आणि अगदी चीनचेही नागरिकत्व घेतले आहे. भारत सोडून बहुतेक लोक अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. त्यांची संख्या सुमारे सात लाख असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय ब्रिटन, रशिया, जपान, इस्रायल, इटली, फ्रान्स, यूएई, युक्रेन, न्यूझीलंड, कॅनडा, जर्मनी या देशांमध्येही मोठ्या संख्येने लोक पोहोचले आहेत. काही लोकांनी युगांडा, पापुआ न्यू गिनी, मोरोक्को, नायजेरिया, नॉर्वे, झांबिया, चिली या देशांचे नागरिकत्वही घेतले आहे.
कोरोनानंतर बहुतेक लोक परदेशात झाले स्थायिक –
पावसाळी अधिवेशनादरम्यान खासदार कीर्ती चिदंबरम यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, कोरोनानंतर 2022 मध्ये सर्वाधिक 2.25 लाख लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले आहे. कोरोनाच्या काळात म्हणजेच 2020 मध्ये सर्वात कमी 85 हजार आणि 2021 मध्ये 1.63 लाख लोक परदेशात स्थायिक झाले.
लोक भारत सोडून का जात आहेत?
यावर माहिती देताना परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञ डॉ. आदित्य पटेल यांनी सांगितले की, ‘आकड्यांवर नजर टाकली तर हे स्पष्ट होते की भारत सोडून जाणारे बहुतेक लोक नोकरदार आहेत. त्यात श्रीमंतांची संख्या कमी आहे. नागरिकत्व सोडलेल्या लक्षाधीश भारतीयांची संख्या केवळ 2.5 टक्के आहे, तर उर्वरित 97.5 टक्के नोकरी करतात.
डॉ. आदित्य यांच्या मते, भारतीय नागरिकत्व सोडणारे 90 ते 95 टक्के लोक करिअरच्या चांगल्या पर्यायांसाठी परदेशात स्थायिक होतात. बरेच लोक लहान देश निवडतात जेणेकरून त्यांना तिथे जाऊन व्यवसाय करता येईल. या देशांमध्ये कर स्लॅबही कमी आहे. यामुळे त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्याची चांगली संधी मिळते. याशिवाय पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका यांसारख्या देशांमध्ये जाणारे बहुतांश लोक त्यांच्या वैयक्तिक कारणांसाठी जातात.
भारतीय जनतेला रोखण्यासाठी सरकार काय करत आहे?
संसदेत केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी प्रश्नाचे उत्तर दिले आहे. ते म्हणाले, ‘बहुतेक लोक कामानिमित्त परदेशात जातात आणि वैयक्तिक सोयीसुविधांमुळे तिथे राहायला लागतात. अशा परिस्थितीत भारतीयांचे स्थलांतर रोखण्यासाठी सरकार अनेक पावले उचलत आहे. मेक इन इंडियाच्या माध्यमातून भारतातच नागरिकांना करिअरचा उत्तम पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.