नवी दिल्ली – भारतात दररोज 70 हजाराहून अधिक करोनाचे रुग्ण बरे होत आहेत. गेल्या 24 तासांत देशात 78,399 रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 37 लाख 2 हजार 595 रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्यचा दर 77.88 टक्क्यांवर पोहोचला आहे.
बरे होणारे देशातील 58 टक्के रुग्ण हे महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि उत्तरप्रदेश या 5 राज्यातील आहेत. महाराष्ट्रात 13 हजाराहून अधिक तर आंध्रप्रदेश राज्यात 10 हजाराहून अधिक रुग्ण एका दिवसात बरे झाले आहेत.
गेल्या 24 तासांत देशात 94 हजार 372 नवीन सक्रीय रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी महाराष्ट्रात 22 हजाराहून अधिक रुग्ण आहेत. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन्ही राज्यात 9 हजाराहून अधिक रुग्ण आहेत.
एकूण नवीन सक्रीय रुग्णांपैकी अंदाजे 57 टक्के रुग्ण हे केवळ पाच राज्यांमधील आहेत. बरे होणारे देशातील 58 टक्के नवीन रुग्ण देखील याच राज्यातील आहेत. आजपर्यंत देशात एकूण 9 लाख 73 हजार 175 सक्रीय रुग्णांची नोंद झाली आहे. 2 लाख 80 हजाराहून अधिक रुग्ण महाराष्ट्रात असून कर्नाटकमध्ये 97 हजारापेक्षा अधिक रुग्ण आहेत.
देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 60 टक्के रुग्ण महाराष्ट्र (28.79 टक्के), कर्नाटक (10.05 टक्के), आंध्र प्रदेश (9.84 टक्के), उत्तर प्रदेश (6.98 टक्के) आणि तामिळनाडू (4.84 टक्के) या पाच राज्यांमध्ये आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 1 हजार 114 मृत्यूची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 391 मृत्यू झाले असून त्यानंतर कर्नाटकमध्ये 94 तर तामिळनाडूमध्ये 76 मृत्यू झाले आहेत.