मुंबई – मुंबईची तुलना पाकिस्तान व्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगना राणावतला भाजप पाठिशी घालत आहे ही बाब दुर्देवी आहे अशी टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यांनी आपल्या पक्षाच्या मुखपत्रातील आपल्या साप्तहिक कॉलम मधून त्यांनी ही टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की मुंबईचे महत्व कमी करण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत. आणि या शहराची सातत्याने केली जाणारी बदनामी याचाच भाग आहे असेहीं त्यांनी म्हटले आहे.
या अवघड काळात सर्व मराठी प्रेमींनी एकत्र राहण्याची गरजही राऊत यांनी व्यक्त केली आहे. कंगना राणावत आणि सुशांत सिंह प्रकरणाचा उपयोग करून त्यांना बिहारच्या निवडणुका जिंकायच्या आहेत. बिहार मधील राजपुत आणि क्षेत्रीय मतांवर डोळा ठेऊन हा सारा खटाटोप सुरू आहे असेही त्यांनी म्हटले आहे. पण हे करताना महाराष्ट्राचा अवमान होतो आहे याची भाजपला फिकीर नाही.
महाराष्ट्राची सध्या ज्या प्रकारे अवहेलाना केली जात आहे त्याबद्दल भाजपच्या एकाहीं नेत्याने खंत व्यक्त केलेली नाही असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले आहे. या अभिनेत्रीने मुख्यमंत्र्यांचा अवमान केला तरी राज्यातल्या जनतेने त्यावर प्रतिक्रीया द्यायची नाही, हे कसले एकतर्फे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असा सवालही राऊत यांनी केला आहे.
ज्या शहराला ती पाकिस्तान म्हणते त्या शहरात तिचे बेकायदा बांधकाम असेल तर त्या प्रकरणी तिने चालवलेली ओरड नाहक असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.