सर्वाधिक खर्च बारामती तालुक्यात : 1 ऑक्टोबर ते 22 जुलैपर्यंत टॅंकरच्या 81 हजार 377 फेऱ्या
पुणे – जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरवर आतापर्यंत तब्बल 20 कोटी 34 लाख 42 हजार रुपये खर्च झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक खर्च बारामती तालुक्यात 5 कोटी 31 लाख 87 हजार रुपये इतका झाला असून 21 हजार 275 टॅंकरच्या फेऱ्या झाल्या आहेत. दरम्यान, 1 ऑक्टोबर ते 22 जुलैपर्यंत 81 हजार 377 टॅंकरच्या फेऱ्या झाल्या आहेत. या आकडेवारीवरून जिल्ह्यातील भयाण पाणीटंचाईची तीव्रता लक्षात येते.
परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे ऑक्टोबर 2018 पासूनच जिल्ह्यातील काही भागात पाणीटंचाईचे संकट उभे राहिले. दिवसेंदिवस दिवस पाणी टंचाईची तीव्रता वाढल्यामुळे प्रशासनाकडून टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मागील पाच वर्षांतील हा भयाण दुष्काळ असून यावर्षी टॅंकरची संख्या 100 ने वाढल्यामुळे जून अखेरपर्यंत 350 च्या पुढे टॅंकरच्या सहायाने पाणीपुरवठा केला जात होता. त्यामध्ये सर्वाधिक टॅंकर इंदापूर आणि बारामतीमध्ये असून आजही या दोन तालुक्यांसह दौंड, पुरंदर, शिरूर, जुन्नर या तालुक्यांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, सद्यःस्थितीत (दि. 24 जुलैला) जिल्ह्यातील 112 गावे, 938 वाड्या-वस्त्यांवरील 3 लाख 26 हजार 79 लोकसंख्येला 182 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात. पावसाळ्याचे दोन महिने संपत आले, तरीही टॅंकरच सुरू असल्यामुळे प्रशासनाबरोबरच शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
यावर्षी टॅंकरची संख्या साडेतीनशेच्या पुढे गेली आहे. त्यासाठी आतापर्यंत अंदाजे 20 कोटी 34 लाखांपर्यंत खर्च आला आहे. त्यामध्ये बारामतीमध्ये सुरुवातीपासून पाणीटंचाईची भीषणता अधिक असल्यामुळे सर्वाधिक खर्च या तालुक्यामध्ये झाला आहे. त्यापाठोपाठ शिरूर तालुक्यात 2 कोटी 63 लाख खर्च झाला असून, 10 हजार 550 टॅंकरच्या फेऱ्या झाल्या आहेत. इंदापूरमध्ये 2 लाख 14 हजार, दौंडमध्ये 2 लाख 16 तर आंबेगावमध्ये 2 कोटी 15 लाख रूपये खर्च आला आहे. त्यामध्ये वेल्हा तालुक्यात सर्वांत कमी टॅंकर असल्यामुळे याठिकाणी 7 लाख 85 हजार रूपये खर्च आला आहे. तर मावळमध्ये एकही टॅंकर सुरू करण्याची वेळ आली नाही.
जिल्ह्यातील पाणीटंचाईसाठी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. यावर्षी टॅंकरची संख्या वाढली असून त्यासाठी आतापर्यंत अंदाजे 20 कोटी 34 लाख रुपये खर्च झाला आहे. त्यामध्ये पंचायत समितीकडून आलेल्या मागणीनुसार 9 कोटी रुपये पंचायत समिती स्तरावर वितरण करण्यात आले आहे.
– सुरेंद्रकुमार कदम, कार्यकारी अभियंता, जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जि. प.