जयपूर: राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. नुकतेच एका 4 वर्षीय मुलासह 5 नवे रुग्ण सापडले आहेत. यातील तिघे जण जयपूरच्या रामगंज आणि घाटगेट भागातील आहेत. जयपूरमध्ये आतापर्यंत करोनाचे 111 रुग्ण आढळले असून त्यातील 102 रुग्ण रामगंज आणि परिसरातील आहेत. तर 102 पैकी 97 बाधित केवळ एका किलोमीटरच्या कक्षेतील रहिवासी आहेत. राजस्थानातील एकूण रुग्णांचा आकडा आता 350 वर पोहोचला आहे.
राज्यात आतापर्यंत 6 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर मंगळवारी राज्यात 42 नवे रुग्ण सापडले होते. यात जोधपूरमध्ये 9, जैसलमेरमये 13, बांसवाडामध्ये 7, जयपूरमध्ये 6, भरतपूर आणि बिकानेरमध्ये प्रत्येकी 3 तर चूरूमधील एका रुग्णाचा समावेश आहे.
जयपूरमध्ये सापडलेल्या रुग्णांमध्ये 13 तबलिगी सदस्यांचा समावेश असल्याचे समजते. तर उर्वरित जणांना ओमानमधून परतलेल्या एका व्यक्तीच्या संपर्कामुळे करोनाची बाधा झाली आहे. सुमारे 10 दिवसांपासून रामंगज आणि परिसराला प्रतिबंधित करण्यात आले आहे. जोधपूर शहरात आतापर्यंत 13 महिलांसह एकूण 30 जण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील 3 जण तुर्कस्तानातून तर 3 जण इंग्लंडमधून परतले आहेत. तर मुंबईहून जोधपूरपर्यंत रेल्वेप्रवासादरम्यान तुर्कस्तानातून परतलेल्या दांपत्याच्या संपर्कात आल्याने एका युवतीला लागण झाली आहे.
नागौरच्या मकरानामध्ये कोरोना संकटामुळे आरोग्य विभागाचे पथक शहरात स्क्रनिंग करत आहे. परंतु या पथकाला विरोधाला तोंड द्यावे लागले आहे. येथील अनेक गल्ल्यांमध्ये लोकांनी एनआरसी आणि एनपीआर सुरू असल्याचा आरोप करत पथकाला स्क्रीनिंग करू दिले नाही. पथकासोबत गैरवर्तन करत रजिस्टर फाडण्यात आले. तर भिलवाडामध्ये 29 मार्चपासून केवळ एक नवा रुग्ण आढळला आहे. तर 27 पैकी 14 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यातील 9 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पूर्ण शहरात 13 एप्रिलपर्यंत महासंचारबंदी लागू करण्यात आली आहे.
झुंझुनू येथे सीमेवरच तपासणी झुंझुनूमध्ये 23 रुग्ण सापडले असून येथील 8 भागांमध्ये करोनाने शिरकाव केला आहे. करोना संसर्गाचा वाढता धोका पाहता सीमाक्षेत्र बंद करण्यात आले आहे. जिल्हयातील प्रवेशाच्या सर्व मार्गांवर वैद्यकीय पथक तैनात राहणार असून प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाणार आहे. तपासणीत संशयास्पद आढळल्यास संबंधित व्यक्तीला थेट क्वारन्टाईनमध्ये पाठविले जाणार आहे.