पिंपरी – गौरी-गणपती सणानिमित्त पिंपरी-चिंचवडच्या वल्लभनगर येथील एसटी आगारातून 7 ते 9 सप्टेंबर दरम्यान नऊ जादा बस कोकणासाठी धावणार आहेत. ज्यादा बसचे नियोजन आगार प्रशासनाच्या वतीने करण्यात आले असून ग्रुप बुकींगची सुविधा देखील करण्यात आली आहे. तर, करोना नियमाचे पालन करुन बसमध्ये नागरिकांना प्रवेश मिळणार आहे. याबाबतची माहिती वल्लभनगर आगार प्रशासनाने दिली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मोठ्या संख्येने कोकणवासीय व्यवसाय व नोकरी निमित्ताने वास्तव्यास आहेत. यामुळे कोकण परिसरामध्ये आगारातून सुमारे 25 टक्के बसेस सोडण्यात येतात. तर, गौरी-गणपती सणांच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांना आपल्या मूळगावी जाणारांची संख्या मोठी असते. यामुळे वल्लभनगर एसटी आगाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही 7 ते 9 सप्टेंबर दरम्यान 9 बसच्या 27 फेऱ्याचे नियोजन केले आहे.
कोकणात जाणाऱ्या जादा बसमध्ये चिपळून सकाळी 6 वाजता व रात्री 9 वाजता, दापोली रात्री 9वाजता, देवरुख रात्री 9:31 वाजता, गुहागर रात्री 10 वाजता, खेड 10:30 वाजता, महाड सकळी 8 तर, रत्नागिरी रात्री 8:38 वाजता वल्लभनगर आगारातून तीन दिवस धावणार आहेत.
तसेच, किमान 40 प्रवाशांचा ग्रुप असल्यास त्यांना आपल्या मूळ गावी एसटी उपलब्ध करून दिली जाणार असून प्रवाशांनी ज्यादा बसेसचा लाभ घ्यावा असे आवाहन वल्लभनगर स्थानक प्रमुख गोविंद जाधव यांनी केले आहे.