नवी दिल्ली -भाजपने सोमवारी निवडणूक आयोगाचा दरवाजा ठोठावत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल निराधार आरोप करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी भाजपने केली आहे.
तरूण चुघ, सुधांशू त्रिवेदी आणि ओम पाठक या भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. केंद्रात पुन्हा सत्तेत आल्यास मोदींचे सरकार राज्यघटना बदलेल.
मोदींना देशावर एकच भाषा लादायची आहे अशा स्वरूपाचे निराधार आरोप राहुल यांच्याकडून केले जात आहेत. ते आरोप लोकशाही मुल्ये क्षीण करणारे आहेत. तसेच, अशांतता फैलावण्याचा धोका निर्माण करणारे आहेत.
निवडणूक आयोगाने याआधी नोटिसा बजावूनही राहुल यांच्याकडून खोट्या आरोपांचे सत्र सुरूच आहे, असे भाजपच्या तक्रारीत नमूद करण्यात आले. तसेच, राहुल यांना ताकीद दिली जावी. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजपने केली आहे.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार तापू लागल्याने शाब्दिक हल्ल्यांची धार वाढली आहे. त्यातून राजकीय पक्षांनी प्रतिस्पर्ध्यांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्याचे सत्रही सुरू झाले आहे.