कोल्हापूर – वेळेत कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेले पन्नास हजार रुपये येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद करावी. अन्यथा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील कार्यालयावर मोर्चा काढल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज दिला आहे.शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी ते बोलत होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटना केंद्र आणि राज्य सरकारविरोधात चांगलीच आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यलयावर मोर्चा विराट काढला. ऐतिहासीक अशा दसरा चौकातून या मोर्चाला सुरूवात झाली. या मोर्चाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे, यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघनेचे कार्यकर्ते सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटने प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.
महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसाही वीज मिळावी यासाठी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी 22 तारखेला महावितरण कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. तसंच शेतकऱ्यांना दिवस शेतीसाठी वीज मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळावी, त्यांना 50 हजारचं कर्ज देण्यात यावे, याची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी, केंद्रीय व राज्य रस्ते व राज्यमार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊनही त्यांच्याकडून टोल वसूल करण्यात येतो त्यामुळे येथून पुढे शेतकऱ्यांच्या जमिनी देणार नाही असा पवित्रा घेऊन त्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्य कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. सध्या शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या खताचा दर कमी करा अन्यथा केंद्रीय मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा देऊन उपोषणाचा इशारा दिला आहे.