पुणे – अम्फान वादळ विरून गेल्यानंतर आता पुन्हा मान्सूनच्या प्रगतीला पोषक वातावरण निर्माण होऊ लागले आहे. त्यामुळे येत्या 48 तासांत तो अंदमानच्या उर्वरित बेटांवर दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अम्फान चक्रीवादळामुळे मान्सूनला चालना मिळाली आणि दि.17 मे रोजी मान्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला. त्यानंतर हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकून गेल्यानंतर तब्बल दहा दिवस झाले आहेत. तरीदेखील मान्सूनची कोणतीही प्रगती झालेली नव्हती.
अम्फान वादळामुळे मान्सूनचे प्रवाह प्रभावित झाले आणि त्यांनी समुद्रावरील सर्व बाष्प ओढून नेल्याने या भागात कोरडे हवामान निर्माण झाले होते. त्यामुळे मान्सूनच्या प्रगतीत अडथळे निर्माण झाले. मात्र, आता हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार येत्या 48 तासांत मोसमी पाऊस यंदा नियोजित वेळेपेक्षा चार दिवस उशिरा म्हणजे दि. 5 जून रोजी मान्सून दाखल होईल, असे हवामान खात्याने कळविले आहे. महाराष्ट्रात साधारणतः 11 जूननंतरच मान्सून दाखल होईल.