थिरुवनंतपुरम – येत्या 31 मे च्या पूर्वीच नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मॉन्सून केरळला पोहोचत असल्याची बातमी आल्याने वेधशाळेसह शेतकरी बांधवांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. येथे साधारणत: 1 जून रोजी राज्यात मान्सून पडतो.
भारतीय हवामान खात्याने ही माहिती दिली असून हवामान खात्याने (आयएमडी) म्हटले आहे की यंदा 31 मे च्या पूर्वीच मॉन्सूनचा केरळमध्ये तडाखा बसू शकेल. या अंदाजात एखाद्या दिवसाचा फरक होऊ शकतो.
भारतीय उपखंडात, मान्सूनचा सुरुवातीचा पाऊस हा दक्षिण अंदमान सागरातून पडतो आणि त्यानंतर मान्सूनचे वारे उत्तर-पश्चिम दिशेने बंगालच्या उपसागराकडे वळतात. नव्या मान्सूनच्या तारखेनुसार 22 मेच्या सुमारास नैऋत्य मोसमी पाऊस अंदमानच्या समुद्रात पोहोचेल.
सध्या अरबी समुद्रावर चक्रीवादळ होण्याची शक्यता आहे, म्हणून समुद्रावरून विषुववृत्तातून जाणारा दक्षिण पश्चिम वारा तीव्र झाला आहे.
विषुववृत्तातून वाहणारे वारे 20 मेपासून बंगालच्या उपसागरामध्ये मजबूत आणि तीव्र होण्याची अपेक्षा असून 21 मेपासून बंगालच्या उपसागर आणि अंदमान निकोबार बेटांवर पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनचा अंदमान आणि निकोबार बेटांवर 21 मेपासून जोर पकडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने यंदा सामान्य मॉन्सूनचा अंदाज वर्तविला आहे. देशातील 75 टक्के पाऊस नैऋत्य मोसमी पावसामुळे होत असतो. यावर भारताची अर्थव्यवस्था अवलंबून असते.