पुणे – यंदा मान्सून अंदमान-निकोबार बेटांवर शनिवारपर्यंत दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
बंगालच्या उपसागरातील दक्षिण भागात येत्या दोन दिवसांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. त्याची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे मान्सूनच्या वाटचालीला पोषक वातावरण निर्माण होऊन येत्या शनिवारपर्यंत बंगालच्या उपसागरात दाखल होईल, असा अंदाज आहे.
दरवर्षी साधारणत: 20 मे च्या दरम्यान मान्सून अंदमान-निकोबारच्या बेटांवर दाखल होतो. यंदा पाच दिवस आधीच तो दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून केरळमध्ये दि. 1 जून रोजी दाखल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात दहा जूननंतरच तो दाखल होईल. यंदा मान्सून शंभर टक्के बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.